Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले


मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता हाहाकार माजवला असून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 6 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून मानखुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखीही काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

Mankhurd Slum Building Accident : एकाच कुटुंबातील 5 मुलांसह शेजाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द मधील हा झोपडपट्टी आणि चाळीचा भाग अत्यंत धोकादायक बनला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून ही चाळ रिकामी करण्यासाठी आधीच नोटीस पाठवण्यात आली होती. प्रशासनाच्या नोटीशीनंतर इथल्या कुटुंबाकडून ही जागा सोडून जाण्यासाठी रविवारी दुपारपासून सामान आवरण्याची आणि बांधाबांध करण्याची तयारी सुरू होती. सर्व जण घर रिकामे करत असतानाच रात्री साडे आठच्या सुमारास अचानक या चाळीचा मोठा भाग पत्त्यांसारखा कोसळला.

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच लहान मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर शेजारच्या घरातील एका मुलाचाही या ढिगाऱ्याखाली गाडून अंत झाला. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या धोकादायक चाळीच्या भिंती अधिक कमकुवत झाल्या होत्या आणि त्यामुळेच हा भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Rain Chawl Collapse : महापालिका प्रशासन जबाबदार, पेडणेकरांचा आरोप

या भीषण दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातून आणि स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या घटनेवर अत्यंत दुःख व्यक्त करत थेट महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “या दुर्दैवी घटनेसाठी संपूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे. आम्ही सातत्याने महापालिकेकडे पावसाळ्यापूर्वी विशेष सभा घेण्याची मागणी करत होतो. जर ती सभा घेतली असती, तर सर्व नगरसेवकांनी आपापल्या भागातील धोकादायक इमारती आणि स्थितीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली असती. वेळीच योग्य पावले उचलली असती तर आज निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला नसता.” 

सध्या घटनास्थळावरून ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *