टीम इंडियाचा चर्चित खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय करिअरची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. वैभवने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेत आपल्या टॅलेंटची झलक दाखवलीय. पण तो अजून कुठली मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवेल अशी तमाम चाहत्यांना आशा आहे. वैभवच्या फलंदाजीत अशी बाब समोर आलीय, जी त्याच्यासाठी अडचणीची ठरु शकते. बाऊन्सर समोर तो झुकत नाही हे त्याच्यासाठी घातक ठरु शकतं. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीच्या बॅटने गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळे त्याला आयर्लंड-इंग्लंड सीरीजसाठी संधी मिळाली. भारताकडून सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे.
त्याला सिनियर टीम इंडियात स्थान देण्याची जोरदार मागणी होत होती. त्यामुळे त्याला संधी मिळाली. पण दोन्ही सामन्यात वैभव लवकर आऊट झाला. त्याने 2-3 सिक्स मारुन या स्टेजसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं. पण त्याच्या फलंदाजीतील एक कमतरता सुद्धा समोर आली आहे. नॉटिंघम मध्ये तिसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीने स्फोटक सुरुवात केली. येताच दोन सिक्स मारले. पण तिसऱ्या ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने एक शॉर्ट पीच चेंडू टाकला. वैभवने त्यावर हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याच्यासाठी घातक ठरलं. विकेटकीपरकडे झेल देऊन त्याला परताव लागलं. त्या बॉलचा स्पीड 145 किमी प्रतितास होता. त्यामुळे वैभव चुकला.
चेंडू बॅटवर सहज येत होता
वैभव सूर्यवंशीसाठी हा मोठा धडा आहे. त्याला लवकरात लवकर तिथे सुधारणा करावी लागेल. आयपीएलमध्ये वैभवने असे चेंडू सहज सीमारेषेपार पाठवले. आयपीएलमध्ये अनेक गोलंदाज त्याच्याविरुद्ध शॉर्ट पीच आणि बाऊन्सर चेंडूचा वापर करत होते. फरक इतकाच आहे की, भारतीय खेळपट्ट्यांवर ज्या वातावरणात आयपीएल सामने झाले, ते पीच फलंदाजीला अनुकूल होते. बहुतांश पाटा खेळपट्टया होत्या. त्यामुळे चेंडू बॅटवर सहज येत होता.
वैभवने हे शिकून घेण्याची गरज
या उलट इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये चेंडूला जास्त उसळी मिळते. चेंडूला पेस असल्यामुळे बाऊन्सरवर पुल किंवा हुकचा फटका खेळणं सोपं नसतं. टायमिंग चुकून कॅच जाण्याची शक्यता असते. अशावेळी बाऊन्सरवर शॉट मारणं हा समजदारीचा निर्णय नाही. अशावेळी बाऊन्सर समोर झुकून तो सोडून देण्यात शहाणपण असतं. कुठल्याही ओव्हरमध्ये दोन पेक्षा जास्त बाऊन्सरची परवानगी नसते. त्यामुळे उर्वरित चार चेंडूंवर चांगल्या धावा बनवता येऊ शकतात. वैभवने हे शिकून घेण्याची गरज आहे.