Thane : राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. काही भागात दुर्घटना देखील घडल्याचं समोर आलं आहे. मुंब्र्यात देखील एक दुर्घटना घडली आहे. साचलेल्या पाण्यात करंट लागून अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. टोरंट पॉवर कंपनीवर नगरसेवकाने गंभीर आरोप केले आहेत.
नेमकी कशी घडली घटना?
मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील ‘यास्मिन पार्क’ इमारतीबाहेर काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला काही कामानिमित्त इमारतीबाहेर पडली होती. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने दुर्घटना घडली आहे. आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला (वय 17) या अल्पवयीन मुलीचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. टोरंट पॉवर कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच अल्पवयीन मुलीचा जीव गेल्याचा एमआयएम नगरसेवक शोएब डोंगरे यांनी थेट आरोप केला आहे. या घटनेची माहिती देताना प्रशासनाने परिसरातील विद्युत सुरक्षा व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मुंब्रा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी