राज्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळाला मुलाखत दिली आहे, या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेश टायगर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंना वाटत होतं तुम्ही ऑपरेशन टायगर थांबवावं, पण तुम्ही थांवलं नाही, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
उद्धव ठाकरेंचं ऐकल्यावर माझंही मनोरंजन झालं, मी ऐकलं. समजा माझा मित्र पक्ष एक ऑपरेशन करत असेल तर मी का म्हणून थांबवावं? असं काय प्रेम आमच्यात उरलंय, की जे माझ्यासोबत दिवसरात्र आहे त्यांना सोडून, ज्यांनी साथ द्यायची वेळ होती तेव्हा जे मला सोडून गेले. त्यांच्यासाठी मी का ऑपरेशन थांबवावं? असा सवाल यावेळी फडणवीस यांनी केला आहे. पॉलिटिकल सर्व्हायवल त्यांचं आहे. माझं नाही. पॉलिटिकल सर्व्हायव्हल कसं करायचं ते मला माहीत आहे, असंही यावेळी फडणीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन फडणवीस सुरू आहे, फडणवीसांचे पंख छाटणं सुरू आहे, फडणवीस हे पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदीत एक गाणं आहे. माना के तेरे जहां में ये नही की प्यार नही मिलता, वह जब चाहीए तब नही मिलता. हे सर्व प्रेम मला २०१९ला हवं होतं तेव्हा प्रेम भंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेम भंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं. संसार थाटला. आमच्या लग्नाचे वाढदिवस झाले. आता काय राहिलं, असंही यावेळी फडणवीस यावेळी म्हणाले.