टीम इंडियाचा स्टार प्लेयर वैभव सूर्यवंशी आज श्रीलंका ए विरुद्ध तिसऱ्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत अ आणि श्रीलंका अ संघात सामना सुरु आहे. श्रीलंका अ ने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशांच्या ‘अ’ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. कारण फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची लढाई अजून रोमांचक बनली आहे. श्रीलंका ए विरुद्ध प्रभसिमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशीची जोडी मैदानात उतरली. वैभवने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. पण त्याला ती लय पकडून ठेवता आली नाही. वैभव सूर्यवंशी 14 चेंडूत 21 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. वैभवने 3 चौकार आणि एक षटकार लगावला.
वैभव सूर्यवंशी चौथ्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने प्रभसिमरन सिंह सोबत पहिल्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. श्रीलंका ए विरुद्ध पहिल्या सामन्यात सुद्धा वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला होता. त्यावेळी तो 14 धावांवर बाद झालेला. नंतर अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात वैभवने 22 चेंडूत 44 धावा फटकावून सूर गवसल्याचे संकेत दिले होते. त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीसाठी हा दौरा खूप महत्वाचा आहे. त्याची सिनियर टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात वैभवला सिनियर टीम इंडियाकडून संधी मिळू शकते. पण त्यासाठी सध्या सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत त्याने दमदार प्रदर्शन करणं गरजेचं आहे.
प्रदर्शनात सातत्य आवश्यक
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने 16 सामन्यात 750 पेक्षा जास्त धावा केल्या. आपली निवड करण्यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या निवड समितीला भाग पाडलं आहे. तो अवघ्या 15 वर्षांचा असून टॅलेंट त्याच्यात कुटून भरलेलं आहे. टीम इंडियात स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या प्रदर्शनात सातत्य आवश्यक आहे. म्हणून या दौऱ्यात वैभवची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे. दांबुलाचा पीच फलंदाजीसाठी अनुकूल मानला जातो. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना पीचकडून काही मदत मिळू शकते. पण नंतर खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होत जाईल. मधल्या षटकात स्पिन गोलंदाज प्रभावी ठरु शकतात. त्यांना पीचकडून टर्न मिळू शकतो. त्यामुळे धावगती नियंत्रणात ठेवता येईल.