IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंदImage Credit source: BCCI
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माची खेळी काही खास नव्हती. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट लॉर्ड्स मैदानावर होणार, अशा वावड्या उठल्या होत्या. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याची खेळी अवघ्या 26 धावांवर आटोपल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. पण बीसीसीआयने या अफवांचं खंडन केलं आणि धुराळा शांत झाला. असं असताना सर्वांचं लक्ष हे लॉर्ड्स मैदानात रोहित शर्माच्या खेळीकडे लागून होतं. या सामन्यात रोहित शर्माची कामगिरी कशी होते? याबाबत चर्चा सुरू होत्या. कारण या सामन्यात फेल गेला असता तर पुढच्या वनडे मालिकेत स्थान मिळणं कठीण झालं असतं. तसेच वनडे मालिकेतून वगळलं तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं स्वप्नही भंगणार होतं. पण रोहित शर्माने शेवटच्या वनडे सामन्यात टीकाकारांची तोंड बंद केली.
इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्यात विजयासाठी 388 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. त्यामुळे चांगली सुरूवात करून देण्याचं काम सलामीच्या जोडीवर होतं. तशीच खेळी कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केली. रोहित शर्माने 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. सलग दोन चौकार मारले आणि अर्धशतक साजरं केलं. या अर्धशतकी खेळीत रोहित शर्माने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतरही त्याची खेळी सुरू होती. त्याने शुबमन गिलसोबत 147 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 77 धावा करून बाद झाला. त्यानंतरही रोहित शर्माचा झंझावात सुरू होता. झपाटल्यासारखा धावांचा पाऊस पाडत होता.
रोहित शर्माने 84 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार मारत शतक साजरं केलं. त्याने 120.24 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे त्याला संघातून वगळण्याच्या बातम्यांना आता ब्रेक लागणार आहे. कारण त्याने अगदी मोक्याच्या सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामुळे रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द अजून थांबली असा संदेश त्याने टीकाकारांना दिला आहे. तसेच अजूनही बरंच क्रिकेट उरल्याचं दाखवून दिलं आहे.