IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख – Marathi News | Where exactly did India lose the match Captain Shubman Gill points to those three overs


IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेखImage Credit source: BCCI

इंग्लंडमध्ये टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची वनडे मालिकेतही पराभव झाला आहे. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे. खरं तर या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आणि मालिका हातून गेली. तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 360 धावा केल्या आणि सामना 27 धावांनी गमावला. या सामन्यानंतर पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने काय चुकलं? ते सांगितलं. नेमका पराभव कुठे झाला ते सांगून टाकलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘मला वाटतं की 45 व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात बरोबरीत होतो. शेवटच्या तीन षटकांमध्ये आम्ही खूप जास्त धावा दिल्या. मला वाटतं, जवळपास 60 धावा दिल्या. तिथूनच सामना आमच्या हातून थोडा जास्तच निसटला.’

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 388 धावांचा पाठलाग करताना जिंकण्याचा विश्वास होता का? या प्रश्नावर शुबमन गिल म्हणाला की, ‘ हो, नक्कीच, आम्हाला वाटलं होतं की जर 40 षटकांनंतर आमच्या हातात विकेट्स राहिल्या असत्या तर आम्ही सामन्यात असतो. पण त्याच वेळी आम्हाला सामन्यात खूप मागे पडायचं नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की पॉवरप्लेनंतर आम्ही धावफलकावर धावा जमा करायला सुरुवात केली, धावगती सहा साडेसहाच्या आसपास आणली. जर आम्ही सहा साडेसहाच्या आसपास खेळत राहिलो असतो आणि मग शेवटच्या 10 षटकांमध्ये 100, 110 धावा केल्या असत्या, तर काय झालं असतं हे सांगता येत नाही.’

इंग्लंडविरुद्धची मालिका गमावली पण सकारात्मक काय घडलं का? त्यावर शुबमन गिल म्हणाला की, ‘जवळपास प्रत्येकाने सामन्यांमध्ये धावा केल्या. मला वाटतं की विशेषतः या सामन्यात आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. खासकरून पॉवरप्लेमध्ये. मला वाटतं की आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप जास्त ऑफ-बॉल टाकले. आणि मग पॉवरप्लेनंतर दोन्ही सलामीवीरांनी ज्या प्रकारे त्याचा फायदा घेतला, ते खरंच जबरदस्त होतं. त्यांनी आम्हाला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. आणि मग शेवटच्या षटकांमध्ये, जसं मी म्हणालो, ते आमच्यापेक्षा खूप पुढे गेले होते. पण या मालिकेत आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत, जवळपास प्रत्येकाने धावा केल्या आणि विकेट्स घेतल्या.’

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या योगदानाबाबत शुबमन गिलने आपलं मत व्यक्त करत सांगितलं की, ‘ त्यांनी गेल्या काही वर्षांत जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आज ज्या प्रकारे फलंदाजीला आला, विशेषतः 140 धावा केल्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला आहे. मला वाटतं की शेवटी खेळपट्टी थोडी संथ झाली होती. त्या धावा करणे सोपे नव्हते. पण मला वाटतं की तो ज्या प्रकारे फलंदाजीला आला, ते पाहणे खरोखरच एक पर्वणी होती.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *