भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ फ्रँचायझीने केवळ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला नाही तर भारतीय सिनेमाचा दर्जाही उंचावला. जगभरात 1,000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट फ्रँचायझी ठरला. मात्र, आज ज्या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले, त्याच्या प्रदर्शनाच्या दिवशी मात्र निर्माते, कलाकार आणि स्वतः राजामौली यांच्यावर प्रचंड मानसिक ताण होता.
नेटफ्लिक्सवरील ‘बाहुबली: द टॉर्चबेअरर’ या माहितीपटात राजामौली आणि निर्माते शोबू यार्लगड्डा यांनी त्या काळातील संघर्ष उलगडून सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली तेव्हा कोणतेही निश्चित बजेट नव्हते. प्रत्येक दिवसाच्या चित्रीकरणासाठी निधी उभारणे ही मोठी कसरत होती.
70 कोटींचे कर्ज
मात्र, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित होण्याच्या दिवशी परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. शोबू यार्लगड्डा यांनी सांगितले की, चित्रपट प्रदर्शित होत असतानाही त्यांच्या कंपनीवर तब्बल 70 कोटींचे कर्ज होते. खर्च आणि मिळालेल्या उत्पन्नाचा हिशोब केला असता ते अजूनही मोठ्या तोट्यात होते.
राजामौली यांनी सांगितले की, हिंदी, अमेरिका, गल्फ देश आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरुवातीला आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहून ते हादरले. सोशल मीडियावर शिवलिंगाऐवजी झंडू बाम दाखवणारे व्यंगचित्र व्हायरल झाले होते. त्यामुळे चित्रपट अपयशी ठरणार अशी भीती सर्वांनाच वाटू लागली.
रिलीजनंतर रचला इतिहास
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’मध्ये प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, सत्यराज आणि नासर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स, दमदार अभिनय आणि राजामौली यांच्या दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला.
यानंतर 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ हा त्याहूनही मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जगभरात सुमारे 1,788 कोटींची कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली आणि आजही तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जातो.
‘बाहुबली’च्या यशामागे केवळ भव्य निर्मिती नव्हती, तर अनेक वर्षांचा संघर्ष, आर्थिक जोखीम आणि संपूर्ण टीमचा प्रचंड आत्मविश्वास दडलेला होता. प्रदर्शनाच्या दिवशी अपयशाची भीती मनात असलेल्या या चित्रपटाने पुढे भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला.