काही गाणी ही केवळ सुपरहिट ठरत नाहीत तर काळाच्या ओघात लोकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनून जातात. त्यांची धून कानावर पडताच पाय आपोआप ताल धरू लागतात आणि चेहऱ्यावर नकळत हास्य उमटते. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील ‘मौजा ही मौजा’ हे गाणेही अशाच गाण्यांपैकी एक आहे. लग्नसमारंभ, डीजे नाईट, मित्रमैत्रिणींची पार्टी किंवा कोणताही जल्लोष असो हे गाणे लागले की वातावरण क्षणात रंगतदार होते.
मात्र या गाण्याच्या सुरुवातीला ऐकू येणाऱ्या काही ओळींबाबत अनेकांना आजही गैरसमज आहे. बऱ्याच जणांना त्या पंजाबी भाषेतील शब्द आहेत किंवा केवळ गाण्याला वेगळेपणा आणण्यासाठी वापरलेले निरर्थक शब्द आहेत, असे वाटते. पण प्रत्यक्षात या ओळींची कहाणी खूपच वेगळी आणि रंजक आहे.
असमच्या लोकगीताशी आहे संबंध
‘मौजा ही मौजा’च्या सुरुवातीला ऐकू येणाऱ्या ओळी या हिंदी किंवा पंजाबी नसून त्या असममधील एका पारंपरिक लोकगीताचा भाग आहेत. संगीतकार प्रीतम यांनी या लोकगीतातील ओळी गाण्याच्या सुरुवातीला अत्यंत कल्पकतेने वापरल्या. त्यामुळे गाण्याला एक वेगळी ओळख मिळाली आणि त्या ओळी श्रोत्यांच्या कायम लक्षात राहिल्या. गाण्याच्या सुरुवातीचे शब्द. आली काटी जाली दिम, बोर पीरा पारी दिम, ताते बोही बोही रोड दे, रोडाली ए रोड दे, ताते बोही बोही रोड दे.
या ओळींचा अर्थ काय?
अनेकांना या शब्दांचा अर्थ आनंद, मौजमजा किंवा नृत्याशी संबंधित असावा असे वाटते. मात्र वास्तवात हा लहान मुलांचा एक निरागस लोकगीत आहे. या गाण्यामध्ये मुले सूर्याला विनंती करतात की, ढगांमागे लपून राहू नकोस. बाहेर ये. आम्ही तुझ्यासाठी मार्ग मोकळा करू, तुला बसण्यासाठी जागाही तयार करू. फक्त आम्हाला भरपूर ऊन दे. या गाण्यातून मुलांची निरागस भावना आणि सूर्यप्रकाशाची आस व्यक्त होते.
‘मौजा ही मौजा’ प्रदर्शित होऊन जवळपास दोन दशके झाली असली, तरी आजही हे गाणे प्रत्येक पार्टीची शान मानले जाते. मात्र या गाण्याच्या सुरुवातीला ऐकू येणाऱ्या ओळींच्या मागे मुलांची सूर्याला केलेली निरागस प्रार्थना दडलेली आहे, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.