अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान सुरु असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अर्थ खात्यावरुन चर्चा सुरु झाली. खरंतर जयंत पाटील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेट घेतली होती. पण या भेटीनंतरच अर्थ खातं कोणाला जाणार, याची चर्चा सुरु झाली. अर्थ खातं पुन्हा आपल्याला मिळावं यासाठी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. तेव्हापासून अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाळत आहेत. पण लवकरच हे अर्थखात मित्र पक्षाकडे दिलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काल जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अर्थ खातं हे या भेटीमागचं कारण असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ नये यासाठी जोर लावला आहे. अर्थ खातं राष्ट्रवादीकडे गेल्यास निधी वाटपात भेदभाव होईल अशी शिंदेंच्या शिवसेनेला भिती आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याचा विषय अमित शाह यांच्या कानावर घातल्याची माहिती आहे. दुसरीकडे चर्चा अशी सुद्धा आहे की, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आल्यास अर्थ खातं हे शरद पवारांच्या पक्षाला मिळू शकतं. जयंत पाटील हे राज्याचे अर्थमंत्री होऊ शकतात.
वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत
जयंत पाटील यांच्याकडे राज्याच्या अर्थ खात्याची धुरा संभाळण्याचा अनुभव आहे. सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा महत्वाचं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्याचवेळी अर्थखात्याचा विषय मांडणार असं सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे. नुकतीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत.