Last Updated:
मागील चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मागील चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाचा वाहतूकीवर देखील परिणाम झाला असून पुणे-मुंबई एसटी सेवा थांबवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुण्याहून मुंबईला जाणारी एकही बस सोडली जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी या दोन शहरांकडे जाण्याचं नियोजन करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
खरं तर, पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व एसटी बस वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर आणि मार्गावरील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुण्याहून निघालेल्या बसेस माघारी बोलावल्या
आज सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघालेल्या ४ एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरात अडकल्या होत्या. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या चारही बसेस सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आल्या आहेत.
विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांचे प्रवाशांना आवाहन
“पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे दोन्ही शहरांमधील एसटी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. प्रवाशांनी कृपया प्रशासनाला सहकार्य करावे. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे साफ होऊन वाहतुकीसाठी मोकळा होत नाही, तोपर्यंत कोणीही या मार्गावरील प्रवासाचे नियोजन करू नये,” असं आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी केलं आहे.
Pune,Maharashtra
Jul 06, 2026 11:56 AM IST
पुणे-मुंबईची ST सेवा पूर्णपणे बंद, निम्म्यातून परत बोलवल्या गाड्या, प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
