Sushma Andhare on Mumbai Pune Missing Link Land Slide: हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकला अवघ्या काही दिवसांमध्येच खड्डे पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आता थेट ‘एन्ट्री पॉईंट’चा स्लॅब कोसळून वरून पूर्णपणे राडारोडा हायवेवर येऊन पडल्याची भयावह घटना आज (6 जुलै) पहाटे घडली. त्यामुळे आता मिसिंग लिंकच्या गुणवत्तेवरून आणि त्याच्या दीर्घकालीन सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मिसिंग लिंकचा भयावह व्हिडिओ समोर आल्यानंतर महायुती सरकारवर कडाडून प्रहार केला आहे. इतकेच नव्हे तर, ‘इन्फ्रा मॅन’चा फुगा फुटल्याचं म्हणत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे.
#WATCH | Maharashtra: A major landslide occurred on the Missing Link section of the Mumbai–Pune Expressway near the Khandala Exit. Consequently, the Mumbai-bound lane has been completely closed.
According to preliminary information, no casualties have been reported. Efforts are… pic.twitter.com/pRUSGhHabx
— ANI (@ANI) July 6, 2026
किमान 70 दिवस तरी काढायचे होते
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा या प्रकल्पाचं गणित मांडलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘जागतिक स्तरावर गौरवण्यात आलेला रस्ता, 1 मे 2026 ला उद्घाटन म्हणजे अवघे 66 दिवस झाले आहेत. 13.3 किमी रस्त्यासाठी 7,120 कोटींचा चुराडा करण्यात आला. अरे प्रतिदिन 100 कोटी रुपये प्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते. पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने ही फक्त एक घटना नाही, तर निकृष्ट आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा ढळढळीत पुरावा आहे. कुठल्या विकासाच्या बाता मारताय?’ असा सवाल सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.
पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला
दरम्यान, पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, दोन खड्ड्यांना “पहिल्या पावसाचं टेस्टिंग” म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही “मान्सून ट्रायल” म्हणणार का? जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प… पण पहिल्याच पावसात विकासच ‘मिसिंग’!
इतर महत्वाच्या बातम्या