आयपीएल 2026 मध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी मोठ्या अपेक्षांसह श्रीलंकेत दाखल झाला, पण मालिकेची त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने सुरुवातीच्या काही सामन्यात धावा केल्या नाहीत. पण श्रीलंका अ विरुद्धच्या फायनल सामन्यात तो आपल्या लयीत पुन्हा आला. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. केवळ 11 चेंडूंत त्याने अर्धशतक ठोकले आणि सर्वत्र चर्चा झाली. वैभवने 29 चेंडूंमध्ये 94 धावा ठोकल्या. वैभवचा खेळ अचानक बदलल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमके काय घडले ज्यामुळे त्याने वादळी खेळी खेळली. आता वैभवने श्रीलंका ‘अ’ संघावरील विजयानंतर, अशी वादळी खेळी खेळण्यामागे त्याला कशाने प्रेरणा दिली हे स्पष्ट केले.
मालिकेतील आपल्या पहिल्या चार डावांमध्ये वैभव सूर्यवंशीने एकूण 117 धावा केल्या. प्रत्येक वेळी त्याला चांगली सुरुवात मिळाली, पण तो त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. मात्र, अंतिम सामन्यात त्याने लिस्ट ‘अ’ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला आणि केवळ 11 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला. तो 29 चेंडूंमध्ये 94 धावांवर बाद झाला आणि त्याने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाच्या 377/9 या सामना-विजयी धावसंख्येचा पाया रचला.
वैभवला मिळाला खास सल्ला
सूर्यवंशी फॉर्ममध्ये परत येण्यास मदत केल्याबद्दल भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांना श्रेय देतो. स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, सूर्यवंशी म्हणतो की, “जेव्हा मी धावा करत नव्हतो, तेव्हा मी काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी कानिटकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. सुरुवातीला मी खूप जास्त प्रयत्न करत होता, पण कानिटकर यांनी मला आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या पद्धतीलाच चिकटून राहण्याची आठवण करून दिली. परिस्थिती थोडी वेगळी होती, त्यामुळे सुरुवातीला मला काही आव्हानांचा सामना करावा लागला. त्यामुळे, मी खूप जास्त प्रयत्न करत होतो पण आपल्या योजना योग्यरित्या अंमलात आणू शकत नव्हतो.” तेव्हाच त्यांनी त्याला सांगितले की, तुझा नैसर्गिक खेळ खेळ आणि जास्त विचार करू नकोस.”