Last Updated:
पोलीस पथक जेव्हा तो कलश घेऊन जिल्हा पोलीस कार्यालयात पोहोचले, तेव्हा तो उघडण्यासाठी सर्व कागदपत्रं आणि नियमांचे पालन करण्यात आलं
सोनं इतकं महाग झालं आहे, सर्वसामान्यांच्या खरेदीच्या बाहेर गेलं आहे. अशातच एका गावामध्ये तलावाची साफसफाई सुरू असताना एक हंडा सापडला. सुरुवातील वाटलं हा काही पाण्याचा हंडा असेल. जेव्हा बाहेर काढून हंडा वर आणण्यात आला, तेव्हा गावकऱ्यांचे डोळे पांढरे झाले. या हंड्यामध्ये २ हजारापेक्षा जास्त सोन्याने भरलेल्या प्राचीन वस्तू होत्या. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नेपाळमधील ऐतिहासिक जिल्हा कपिलवस्तुमध्ये घडली आहे. गावात तलावाच्या साफसफाईदरम्यान हा खजाना गावकऱ्यांच्या हाती लागला आहे. नेपाळमधील कपिलवस्तु नगरपालिका-5 येथील बसनी गावातील आहे. मंगळवारी दुपारी गावातील लोक जवळच्या एका जुन्या तलावाची साफसफाई करत होते. चिखल आणि माती काढताना ग्रामस्थांना एका ठिकाणी लोखंडासारखी वस्तू लागली. जेव्हा लोकांनी आजूबाजूची माती काढली, तेव्हा त्यांना तांब्यासारखा एक जड कलश आढळला. आता कलश पाहिल्यावर लोकांनी अंदाज बांधला ही हा सोन्याचा हंडा आहे.
हंडा सापडला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती कळताच मर्यादापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसर ताब्यात घेऊन आजूबाजूच्या ठिकाणीही खोदकाम केलं. त्यानंतर तो प्राचीन कलश सुरक्षितपणे सोबत घेऊन गेले.
पोलीस पथक जेव्हा तो कलश घेऊन जिल्हा पोलीस कार्यालयात पोहोचले, तेव्हा तो उघडण्यासाठी सर्व कागदपत्रं आणि नियमांचे पालन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक नेते, संग्रहालयाचे जाणकार आणि पत्रकारांसमोर हा कलश उघडण्यात आला. कलशाचे झाकण उघडताच, आत जुन्या नाण्यांचा ढिगारा पाहून सर्वजण थक्क झाले. जेव्हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरू केली, तेव्हा एक-एक करून एकूण 2,314 तांब्याची नाणी निघाली. नाण्यांचा इतका मोठा ढिगारा पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले.
प्राथमिक माहितीनुसार, ही नाणी प्राचीन आहे, त्यामुळे प्राचीन नाणी आणि त्या तांब्याच्या कलशाला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. सापडलेली सर्व 2,314 नाणी त्याच कलशासह तिलौराकोटच्या प्रसिद्ध ‘कपिलवस्तु म्युझियम’ला अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली आहेत. आता पुरातत्व विभागाचे तज्ञ ही नाणी पूर्णपणे सांभाळून ठेवतील आणि अभ्यास करतील. इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ आता नाण्यांवर बनवलेल्या आकृत्या, त्यावर लिहिलेली अक्षरे आणि त्यांची बनावट काळजीपूर्वक तपासत आहे. ही नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत, ती कोणत्या राजाच्या काळात बनवली गेली होती याचा शोध घेतला जात आहे.
जिथे हा खजिना सापडला आहे, त्या कपिलवस्तुचा इतिहास जगभरात खूप पवित्र आणि जुना मानला जातो. प्राचीन तिलौराकोट शहर याच परिसरात वसलेलं आहे, ज्याला शाक्य वंशाची राजधानी आणि भगवान गौतम बुद्धांच्या बालपणाची कर्मभूमी म्हटलं जातं. असं मानलं जातं की, भगवान बुद्धांनी आपल्या जीवनातील सुरुवातीची 29 वर्षे याच ऐतिहासिक भूमीवर घालवली होती. यामुळेच कपिलवस्तुमध्ये सापडलेल्या कोणत्याही जुन्या नाण्यांचा किंवा अवशेषांचा संबंध थेट मौर्य काळ, कुषाण काळ किंवा भगवान बुद्धांच्या काळाशी जोडला जाण्याची पूर्ण शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 23, 2026 12:00 AM IST
Pond Treasure: घटना खरी आहे! तलावाची सफाई सुरू होती अन् सापडला हंडा, उघडून पाहिल्यावर सगळेच बघतच राहिले
