Last Updated:
प्रकाश तुळशीराम मगर असं मृत वारकऱ्याचं नाव आहे. प्रकाश मगर हे माळशिरस तालुक्यातील विझोरी गावच्या हद्दीत पोहोचले होते.
पंढरपूर : ‘भेटी लागी जीवा लागलीस आस’ म्हणत विठूरायाचा गजर करत लाखो वारकरी हे पंढरपूरकडे चालत निघाले आहे. पायी दिंडी करत वारकरी हे विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ आहे. अशातच माळशिरसमधून एक मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या एका वारकऱ्याला विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील विझोरी गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश तुळशीराम मगर (वय 40, राहणार खडगाव जिल्हा लातूर) असं मृत वारकऱ्याचं नाव आहे. प्रकाश मगर हे माळशिरस तालुक्यातील विझोरी गावच्या हद्दीत पोहोचले होते. यावेळी सकाळी महादेव काळे या शेतकऱ्याच्या विहिरीत सकाळी आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक प्रकाश मगर यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत कोसळले. विहिरीत पाण्याची पातळी जास्त होती, त्यामुळे विहिरीत बुडूून मगर यांचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाला प्रकाश मगर हे परतले नसल्याचे पाहून स्थानिकांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा प्रकाश मगर हे विहिरीत पडले असल्याचं समोर आलं. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अकलूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने प्रकाश मगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांच्या मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद अकलूज पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद म्हणून करण्यात आली आहे.
दरम्यान, आषाढी साठी सर्व मानाच्या संतांच्या पालख्या बुधवारपासून पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर तालुक्यात असणारा शेवटचा विसावा अर्थात वाखरी पालखी तळ हा पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज असताना दिसून येतोय. वाखरी पालखी तळावर संपूर्णपणे स्वच्छता करून मुरमीकरण आणि सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच संतांचा मेळा वाखरीच्या पालखीतळावर पंढरपूर तालुक्यात भरेल.
Pandharpur,Solapur,Maharashtra
Jul 21, 2026 11:19 PM IST
