भारतीय टीम मॅनेजमेंटने अजूनही वैभव सूर्यवंशीला संधी दिलेली नाही. हा निर्णय अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना पटत नाहीय. त्यापैकीच एक आहेत रवी शास्त्री. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला आयर्लंड विरुद्ध संधी मिळाली पाहिजे होती, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीजसाठी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड झाली आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभवला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. आक्रमक, तडाखेबंद फलंदाजीसाठी वैभव सूर्यवंशी ओळखला जातो. पहिली ओव्हर नाही, तर पहिल्या चेंडूपासून तो गोलंदाजांवर तुटून पडतो. त्यामुळे त्याच्यासारख्या प्रतिभावान फलंदाजाला बेंचवर बसवून त्याचं टॅलेंट वाया घालवू नये, असं क्रिकेट चाहत्यांबरोबर दिग्गजांचं मत आहे. आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया आतापर्यंत तीन सामने खेळली आहे. त्यात तिन्ही सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माचं ओपनिंगला आले आहेत.
वैभव सूर्यवंशीला आयर्लंड विरुद्ध संधी मिळायला पाहिजे होती. त्या वातावरणात वैभवने आयरिश गोलंदाजी फोडून काढली असती असं रवी शास्त्री यांचं मत आहे. “अरे, त्याने खेळायला पाहिजे होतं यार. ती इतकी संथ आणि मऊ खेळपट्टी होती. वैभवने गच्चीवर सिक्स मारेल असते. ते इतकं छोटं ग्राऊंड होतं की, वैभवने त्यांची पॅन्ट उतरवली असती. त्याने तिथे नक्कीच खेळायला पाहिजे होतं” असं रवी शास्त्री म्हणाले. “आता त्याला इंग्लंडमध्ये खेळवतील की नाही या बद्दल मला खात्री नाहीय. लवकरात लवकर त्याला संधी द्या. आयपीएलमध्ये त्याने प्रत्येकाची गोलंदाजी फोडून काढली आहे. तुम्ही मला सांगा, कुठल्या फास्ट बॉलरला त्याने सोडलं? आणि तुम्ही त्याला बेंचवर बसवून ठेवताय” अशा शब्दात रवी शास्त्री यांनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना आपला संताप व्यक्त केला.
रवी शास्त्री जे बोलले, त्यात पॉइंट आहे
टी 20 चा वर्ल्ड कप जिंकून आयर्लंडमध्ये खेळायला आलेल्या टीम इंडियाचा 2-0 ने पराभव झाला. क्रिकेट विश्वातील आयर्लंडकडे एक दुबळा संघ म्हणून पाहिलं जातं. त्या टीमने भारतीय संघाला हरवलं. खरंतर रवी शास्त्री जे बोलले, त्यात पॉइंट आहे. आयर्लंड सारख्या टीम विरुद्ध वैभव सूर्यवंशीला चान्स द्यायला पाहिजे होता. कारण तुलनेने इंग्लंडचा संघ मजबूत आहे.