भारतीय क्रिकेट संघाला T20 क्रिकेटमध्ये अनपेक्षित स्थितीचा सामना करावा लागतोय. विद्यमान T20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाचा सलग दोन मालिकांमध्ये पराभव झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी20 सीरीज गमावली. महत्वाचं म्हणजे या दोन्ही दौऱ्यात टीम इंडियाला एक सामना जिंकता आला नाही. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खूप खराब सुरुवात झाली आहे. सलामीवीराच्या जागेसाठी संगीत खुर्चीसारखी स्थिती होती. संजू सॅमसनला आयर्लंड विरुद्ध दोन आणि इंग्लंड विरुद्ध दोन टी20 सामन्यात संधी मिळाल. तिन्ही सामन्यात खराब स्कोर केल्यामुळे त्याच्याजागी बहुचर्चित वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. पण वैभव तिन्ही सामन्यात छाप पाडू शकला नाही. सॅमसनला पुन्हा पाचव्या सामन्यात संधी मिळाली. पण तिथेही भारताचा पराभव झाला.
भारताचे माजी क्रिकेटपटू हनुमा विहारीने टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या टीम निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. खासकरुन शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य देण्यावरुन. कारण सध्या दोघांचा फॉर्म खराब आहे, तरीही त्यांना वारंवार संधी देण्यात आली. “गौतम गंभीरचे काही फेवरेट खेळाडू आहेत. त्यांना तो टीममध्ये जास्त संधी देतो. संघात त्यांना घेण्याचा काही फायदा आहे असं मला वाटत नाही” असं हनुमा विहारी युट्यूब चॅनलवर म्हणाला.
संघ निवडीत संगीत खुर्ची
“काही खेळाडू टीममध्ये काय करतायत हे मला समजत नाही. दुबे गोलंदाजी करत नाही. फिल्डिंग करत नाही आणि त्याच्या फलंदाजीतही तो फ़ॉर्म दिसलेला नाही. शेडगे सुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजीत आकर्षक वाटला नाही. वॉशिंग्टन सुंदर अजूनही टीममध्ये का आहे? हे मला अजूनही कळलेलं नाही. मागच्या काही वर्षातील या खेळाडूंचं योगदान बघितलं, तर फार ग्रेट नाहीय” असं हनुमा विहारी म्हणाला. संघ निवडीत जी संगीत खुर्ची चाललीय, त्यावर सुद्धा त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
निवड मुख्य प्रॉब्लेम
“वरुण चक्रवर्ती असो किंवा अक्षर पटेल फिरकी गोलंदाज मुख्य प्रॉब्लेम आहेत. रवी बिश्नोईची निवड का केली? निवड आणि प्लेइंग इलेव्हनची निवड हे मुख्य प्रॉब्लेम आहेत. आयर्लंडमध्ये तुम्ही सॅमसनला संधी दिली आणि नंतर सूर्यवंशीला खेळवलं. संजूला तीन सामन्यानंतर वगळलं. टीममध्ये अजिबात सुरक्षितता नाहीय. जर, तुम्ही खेळला नाहीत तर तुम्हाला काढून टाकणार. तुम्ही खेळाडूंना एक दीर्घ संधी दिली पाहिजे.