BLOG : मानखुर्दमध्ये दोन मजली घर कोसळले, पाच लहान चिमुरड्यांसह एक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. वांद्रे गरीबनगर येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कारवाई झाली आणि मुंबईत आता अशा अनधिकृत घर कम इमारतीवर जोरदार कारवाई सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र ती साफ फोल ठरली. मुंबईत बहुतांश अशा अनधिकृत झोपड्या कम चार-पाच मजली अनधिकृत इमारती, कुर्ला, वांद्रे, गोवंडी, मानखुर्द इत्यादी वस्त्यांमध्ये अशा सर्रास अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या, राहत आहेत आणि राहतील…याचे कारण म्हणजे मुंबई मनपाने बंद करून घेतलेले डोळे, मोठा भ्रष्टाचार, राजकीय दबाव आणि मोठा अनधिकृत धंदा…
आता यात आयशा मंजिल पॅटर्न काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल…
तर गोष्ट आहे कुर्ला एल वॉर्ड पासून अगदी हाकेचा अंतरावर उभारली जात असलेली आयशा मंजील इमारतीची… काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी या बांधकाम बाबत पालिकेच्या सर्व विभागात तक्रारी केल्या. इतकेच काय तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या इमारतीबाबत पालिका एल विभागाला कारवाई बाबत पत्र लिहिले. मात्र अजून ही इमारत उभी नाही तर आता यातील घरे विक्रीसाठी तयार होऊन काही विक्री ही झाले आहेत.
सुमारे 40 लाख रुपये किमतीत या एक एक घराची विक्री करण्यात येत असल्याची माहिती आहे. अशा सुमारे आठ ते दहा अनधिकृत इमारती संबंधित व्यक्ती उभारत आहेत. आणि हे सगळे चालू आहे सिटी सिव्हिल कोर्ट चा स्टे घेऊन…!!!
याचा थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आले की याच आयशा मंजिल पॅटर्न चा वापर करून कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, पार्कसाईट, वांद्रे इत्यादी परिसरात सर्रास अनधिकृत तकलादू इमारती उभारल्या गेल्या आणि अजून ही उभारल्या जात आहेत.
मुंबईत एखाद्या ठिकाणी इमारत उभारण्यासाठी एखाद्या विकासकाला किती कष्ट करावे लागतात, किती खर्च , किती परवानग्या लागतात याची माहिती घेतली की कळते हे किती कठीण काम असते. मात्र मुंबईच्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेल्या आणि कायदा सुव्यवस्था याचा अगदी कमी संपर्क असलेल्या भागात सर्रास आयशा मंजिल पॅटर्न राबविला जात आहे. दोन ते चार भूमाफिया मिळून स्वतःचे काही पैसे लावतात. ते झोपडपट्टी मधली चार पाच घरांचे मालक हेरतात त्यांना पैशाच आमिष दिले जाते. मग या पाच सहा झोपड्यांच्या जागी चार पाच मजली इमारतीचे काम सुरू होते. याला राजकीय आणि पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे अशक्य आहे.
मग राजकारणी, अधिकारी, तक्रारदार यांचे ठरलेले रेटकार्ड नुसार पैसे वाटप होते आणि बांधकाम सुरू होते. साध्या लोखंडी ढाच्यावर चार पाच मजली पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे धोकादायक बांधकाम उभारले जाते. तक्रार होणारच म्हणून पालिका अशा बांधकामावर टोच्या मारल्यासारखे कारवाईचे फोटो काढून ठेवते. नोटिसा तयार ठेवते. पुढे आणखी तक्रार झाल्यास आधीच सिटी सिव्हिल कोर्टमध्ये वकील तयार असतात. तक्रार झालीच की सिटी सिव्हिल कोर्ट मधून स्टे घेतला जातो, आणि याचा हवाला देत मग पालिकेत किती ही तक्रारी करा प्रकरण कोर्टात आहे, सांगून अभय देण्याचे काम सुरू होतं.
स्टे म्हणजे जैसे थे स्थिती. पण या काळात इमारतीचे उरले सुरले काम पूर्ण करून इथली घरे चाळीस-पन्नास लाख रुपयांना विक्री केली जाते आणि हे माफिया, दुसऱ्या ठिकाणी नव्या बांधकामाला लागतात. आता त्यांचा त्या इमारतीशी संबंध राहिलेला नसतो. अगदी एखाद्याने जोरदार विरोध केल्यास पालिका एमआरटीपीचा जवळील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे गाजर दाखवते. एखाद्याची रेती रस्त्यावर पडलेली असेल तर तुटून पडणारे पोलीस ठाण्याचे बिट मार्शल, पोलीस अधिकारी अशा ठिकाणी मूकदर्शक असतात, याचे कारण तर सर्वांनाच माहिती आहे.
गेल्या काही वर्षात अशा शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. अनेक पडल्या, अनेक कुटुंब बेघर झाली, अनेक जीव गेले . मात्र हा धंदा मुंबईत पालिका अधिकारी, राजकारणी, पोलीस या सगळ्यांना घेऊन बेफाम सुरू आहे.
आयशा मंजिल हे एक उदाहरण असले तरी ही उभारणाऱ्या व्यक्तीने आता पर्यंत अशा आठ ते दहा इमारती याच भागात उभारल्या असल्याचे समजले. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या बाबत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला खरा, पण असा काही पॅटर्न सेट आहे की आता काहीच होऊ शकणार नाही. आता पालिका सिटी सिव्हिल कोर्टकडे बोट दाखवणार, आधी थोडीफार तोडक कारवाई केल्याचे फोटो दाखवणार आणि मोठी कारवाई म्हणून एमआरटीपी केल्याच्या एफआयआर पुढे करणार. पण मूळ उभारलेली अनधिकृत इमारतमध्ये कुटुंब आलेली असणार, केस वर्षानुवर्षे चालणार अश्या शेकडो एमआरटीपी पचवून हे भूमाफिया गब्बर होत राहणार आणि …. प्रत्येक वेळी आपण फक्त त्या इमारती कोसळल्यावर मृतांचे आकडे मोजत चूकचुकत पुढच्या विषयाकडे वळणार…
हा आयशा मंजिल पॅटर्न मुंबईभर पसरला आहे, कॅन्सर सारखा…त्याला गरिबीचा मुलांमा चढवला गेला आहे. काही ठराविक विभागात पालिकेच्या सहकार्याने हे सर्रास सुरू आहे… सत्ताधारी बदलले आहेत, कदाचित पुन्हा बदलतील… पण हा आयशा मंजिल पॅटर्न सुरूच राहील. तोपर्यंत जोपर्यंत मुंबईला शिस्त लावण्याचा मनापासून प्रयत्न करणारे शासक येणार नाहीत.
बघू हे कधी शक्य होईल…की अश्या आयशा मंजिल मुंबईच्या कानाकोपऱ्यात हे पॅटर्न वापरून उभ्या होतच राहतील आणि मृतांचे आकडे असेच येत राहतील.