अमिताभ बच्चन यांचा फोन आला आणि..
Amitabh Bachchan : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळालेली नाही, तर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेतही मोठी सुधारणा झाली आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांनीच अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन. ते अयोध्येच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर, त्यांनी अयोध्येत एकापाठोपाठ एक असे जमिनीचे अनेक मोठे भूखंड खरेदी केले.
एका कार्यक्रमादरम्यान ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढ़ा’ चे फाऊंडर आणि CMD अभिनंदन लोढा यांनी अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. या परिषदेत रिअल इस्टेट गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून अयोध्येची वाढती लोकप्रियता त्यांनी अधोरेखित केली तसेच अनेक रंजक किस्से त्यांनी सांगितले. अयोध्येत जमीन खरेदी करण्याची इच्छा अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केलं.
मध्यरात्री 3 ला आला बिग बींचा फोन आणि..
अभिनंदन लोढा यांनी 2023 मधील एक किस्सा सांगितला, जेव्हा ते ऑस्ट्रेलियात होते. एके दिवशी पहाटे 3 वाजता त्यांना एक फोन आला. त्याआधी मला काही ‘मिस्ड कॉल्स’ आणि मेसेज आले होते, “मी अमिताभ बच्चन बोलतोय, कृपया तुमच्या वेळेनुसार मला परत फोन करा.” असं त्यात लिहील्याचं लोढा यांनी सांगितलं.
त्यानंतर लोढा यांनी अमिताभ बच्चन यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले, ” अभिनंदन जी, मी UP चा आहे आणि मला अयोध्येत जमीन खरेदी करायची आहे.” त्यानंतर अमिताभ यांनी त्यांना जमिनीची किंमत विचारली. 150000 स्क्वेअर फीट जमिनीची किंमत 15 कोटी असल्याचे अभिनंदन यांनी बिग बींना सांगितलं. त्याच्या पुढल्याच दिवशी अमिताभ बच्चन यांनी त्यांना 15 कोटी पाठवले आणि ती डील फायनल झाली, अशी आठवण लोढा यांनी सांगितली.
अयोध्येच्या लोकप्रियतेत वाढ
भारतातील मंदिर शहरांच्या आसपास सांस्कृतिक पर्यटनाच्या विकासामुळे ही ठिकाणे ज्येष्ठ नागरिकांच्या निवास समुदायांसाठी पसंतीची स्थळे बनत आहेत, असं लोढा यांनी सांगितलं. यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. व्हॅटिकन सिटीला दरवर्षी सुमारे 1 कोटी लोक भेट देतात, तर सुमारे 25 कोटी पर्यटक अयोध्येकडे आकर्षित होतात, असं त्यांनी नमूद केलं.
त्यामुळे, जेव्हा एखाद्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात, तेव्हा तिथल्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो हे स्वाभाविक आहे. स्थानिक रहिवाशांना त्यांच्या जमिनी चांगल्या किमतीला विकण्याची संधी मिळाल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येऊ शकते.. विशेष म्हणजे, अयोध्येत गुंतवणूक करणाऱ्या मान्यवरांमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा समावेश आहे.