हिंदी चित्रपटसृष्टीत सैन्य आणि युद्धावर अनेक चित्रपट निर्माण झाले, मात्र 1964 मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक चेतन आनंद यांचा 'हकीकत' हा चित्रपट आजही देशभक्तीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.
1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात युद्धाचे वास्तव, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्याग अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
या चित्रपटातील 'कर चले हम फिदा जानो-तन साथियों' हे गाणं आजही स्वातंत्र्यदिन, शहीद दिन आणि विविध लष्करी कार्यक्रमांमध्ये आदराने वाजवले जाते. संगीतकार मदन मोहन, गीतकार कैफी आझमी आणि गायक मोहम्मद रफी यांच्या योगदानामुळे हे गाणं अजरामर झाले आहे.
विशेष म्हणजे हे गाणं CBSE च्या दहावीच्या हिंदी अभ्यासक्रमातही समाविष्ट आहे. हकीकतमध्ये धर्मेंद्र, बलराज साहनी, प्रिया राजवंश यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या. या चित्रपटामुळे चेतन आनंद यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली.
चेतन आनंद यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय चित्रपट दिले. 'नीचा नगर' (1946) हा त्यांचा पहिला चित्रपट कान चित्रपट महोत्सवात 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.




