टीम इंडियाचं विमान जमिनीवर आलय. पहिल्याच सामन्यात दुबळ्या आयर्लंडने भारतीय संघाचा पराभव केला. आपण सहज जिंकणार असंच सर्वांना वाटत होतं. पण आयरिश खेळाडूंनी आपल्या दमदार परफॉर्मन्सने हा भ्रम मोडीत काढला. प्रत्यक्ष या सामन्याला सुरुवात होण्याआधी वैभव सूर्यवंशीची बरीच चर्चा होती. आयर्लंड विरुद्ध सामन्यात टीम इंडियाकडून त्याचा डेब्यू होईल अशी सर्वांना आशा होती. पण भारतीय टीम मॅनेजमेंटने वैभवला संधी दिली नाही.त्यांनी वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंवर विश्वास दाखवला. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला मोठा धक्का बसला.भारतातीलच नव्हे, तर क्रिकेट विश्वातील अनेकांचे डोळे वैभवच्या पदार्पणाकडे लागले होते. पण 15 वर्षाच्या वैभवला डेब्यूसाठी अजून थोडी वाट पहावी लागेल असं दिसतय.
श्रेयस अय्यरसाठी सुद्धा हा सामना खास होता. भारताच्या टी20 टीमचा कॅप्टन बनल्यानंतर त्याची ही पहिलीच मॅच होती. पण कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात त्याच्या नावावर सुद्धा पराभवाची नोंद झाली आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन या तिघांच्या स्थानाला त्याने धक्का लावला नाही. तिघेही टॉप ऑर्डरमध्ये खेळतात. वैभवला संधी द्यायची झाली, तर या तिघांपैकी एकाला बसवणं भाग होतं. वैभव सूर्यवंशी सध्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला संधी दिली पाहिजे होती, असं मायकल वॉनचं मत आहे. श्रीलंकेत तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये नुकतीच वैभवने आपली क्षमता दाखवून दिली. पहिल्या चार सामन्यात फ्लॉप ठरलेल्या वैभवने फायनलमध्ये 29 चेंडूत 94 धावा चोपल्या होत्या. त्याने मैदानावर फोर, सिक्सचा पाऊस पाडलेला.
Can’t believe India haven’t picked Vaibhav Sooryavanshi .. the best T20 player at the moment in the World .. #India
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 26, 2026
16 सामन्यात 776 धावा फटकावल्या
वैभव सूर्यवंशीला निवडलं नाही म्हणून नाराजी व्यक्त करणाऱ्या मायकल वॉनने तो सध्याच्या घडीचा T20 मधील जगातील बेस्ट क्रिकेटर असल्याचं म्हटलं. भारताने वैभव सूर्यवंशीला प्लेइंगल इलेव्हनमध्ये संधी दिली नाही, यावर ‘माझा विश्वास बसत नाहीय. सध्याच्या घडीचा तो टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे’ अशा शब्दात वॉनने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या 16 सामन्यात 776 धावा फटकावल्या आहेत. त्या बळावर त्याने टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. एका शतकासह दोनवेळा त्याने 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या एकाच सीजनमधील ख्रिस गेलचाा सर्वाधिक षटकारांचा विक्रम सुद्धा मोडीत काढला.