साउथ सिनेमातील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक भाग्यराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भाग्यराज यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. भाग्यराज हे असे फिल्ममेकर होते ज्यांनी सुमारे पाच दशके उत्तम करिअर घडवले आणि तमिळ सिनेमाला आपल्या योगदानाने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
रस्त्यातच झाले निधन
दिग्दर्शक भाग्यराज यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात तातडण्यात आले. पण वाटेत असतानाच भाग्यराज यांना मृत्यूने गाठलं. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं. तसेच त्यांना मृत घोषित केले.
गाजलेले सिनेमे
विशेष म्हणजे, भाग्यराज यांनी प्रथम भारतीराजा यांच्या पहिल्या चित्रपटात, १६ वायथिनिले (१९७७) मध्ये ज्युनियर कलाकार म्हणून एक छोटीशी भूमिका करून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर त्यांनी भारतीराजा यांच्या सिगप्पु रोजक्कल (१९७८) मध्ये संक्षिप्त भूमिका केली आणि त्यासाठी संवादही लिहिले. त्यांनी १६ वायथिनिले आणि किझाक्के पोगम रेल (१९७८) या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. टिक टिक टिक (१९८१) चित्रपटासाठी त्यांनी पटकथा देखील लिहिली. नंतर त्यांनी सुवरिलाधा चिथिरंगल (१९७९) या चित्रपटाने दिग्दर्शनाची सुरुवात केली, ज्यात त्यांनी सुधाकर आणि सुमती यांच्यासोबत अभिनयही केला. त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये सुवरिलाधा चिथिरंगल (१९७९), ओरु काई ओसाई (१९८०), मौना गीतंगल (१९८१), अंधा ७ नाटकल (१९८१), डार्लिंग डार्लिंग डार्लिंग (१९८२), मुंडनई मुदिचू (१९८३), धवानी कनवुगल (१९८४), चिन्ना वीदु (१९८५), एंगा चिन्ना रासा (१९८७) आणि अवसारा पुलिस १०० (१९९०) यांचा समावेश आहे.
भाग्यराज यांच्या अनेक चित्रपटांचे तेलुगू आणि हिंदीमध्ये रिमेक बनवण्यात आले. जेव्हा भाषेच्या सीमा ओलांडणे सामान्य नव्हते, तेव्हा त्यांनी त्या सीमा पार केल्या. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तमिळ साप्ताहिक मासिक ‘भाग्य’चे संपादन केले आणि अनेक कादंबऱ्या देखील लिहिल्या. नंतरच्या काळात त्यांनी सहाय्यक भूमिकांद्वारे अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. अलीकडेच ते धनुष यांच्या कुबेरा (२०२५) चित्रपटात दिसले होते.
जानेवारी २०२६ मध्ये आपल्या गोल्डन ज्युबिली सोहळ्यादरम्यान, जेव्हा रजनीकांत आणि कमल हासन प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते, तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की ते पुन्हा दिग्दर्शन करणार आहेत. एक चित्रपट आणि कदाचित एक वेब सिरीज. तमिळ सिनेमाला याचीच प्रतीक्षा होती. मात्र, चाहत्यांचे हे स्वप्न आता अपूर्ण राहिले आहे. भाग्यराज यांच्या पश्चात मुलगा (अभिनेता शांतनु भाग्यराज), मुलगी (सरन्या) आणि पत्नी (पूर्णिमा) असा परिवार आहे.