तुम्ही बोलणं टाळा… डॉक्टरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला; ट्विटमध्ये काय म्हटलं? – Marathi News | Supriya sule voice rest doctors advice throat swelling health update


राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. घशात सूज आल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे या पुढील काही काळ भाषणे, मुलाखतींपासून दूर राहणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

सुप्रिया सुळे यांना आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला

खासदार सुप्रिया सुळे या नेहमी आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात, मात्र आता त्या काही काळ मीडियापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यांना डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ‘आज मी घसा आणि आवाजाच्या तपासणीसाठी डॉ. मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या घशात थोडी सूज असल्याचे सांगितले असून, आवाजाला पूर्णपणे विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. आता मी व्हॉईस थेरपी घेणार असून, पुढील एक ते दोन आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहे. सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.’

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

काल सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर जाऊन सोमन वांगचूक आणि अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. याबाबत ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, ‘आज मी जंतर-मंतर येथे जाऊन सोनम वांगचुक आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सोनमजींच्या प्रकृतीबद्दल मला गंभीर चिंता वाटत असून, देशाला त्यांच्या आवाजाची आणि नेतृत्वाची गरज असल्यामुळे त्यांनी आपले उपोषण समाप्त करावे, अशी मी त्यांना विनंती केली.’

पुढे आपल्या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटले की, ‘हे कोणतेही राजकीय आंदोलन नाही. हा आपल्या तरुणांच्या भवितव्याचा आणि NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सरकारने अद्याप विद्यार्थ्यांशी कोणताही अर्थपूर्ण संवाद सुरू केलेला नाही. लोकशाहीमध्ये सत्तेची प्रतिक्रिया ही संवेदनशीलतेने असावी, मौनाने नव्हे. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करणाऱ्या सोनमजी आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांच्या चिंता प्रामाणिकपणे ऐकल्या जाव्यात आणि त्यांचे निराकरण करुणा, न्याय व निष्पक्षतेने व्हावे. या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशातील तरुणांचा आवाज ऐकला जाईपर्यंत मी हा मुद्दा संसदेत आणि प्रत्येक योग्य व्यासपीठावर सातत्याने मांडत राहीन.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *