मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या 15 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आदिनाथ आणि उर्मिलाने मिळून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. खूप विचार केल्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने घटस्फोट घेत आहोत, असं या पोस्टमध्ये दोघांनी म्हटलंय. त्याचसोबत यापुढेही मुलगी जिजा हिच्यासाठी नेहमीच एकत्र राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. डिसेंबर 2011 मध्ये आदिनाथ आणि उर्मिला यांनी लग्न केलं होतं.
आदिनाथ-उर्मिलाची पोस्ट-
‘खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील,’ असं या पोस्टमध्ये म्हटलंय.
फेसबुक पोस्ट-
यात त्यांनी पुढे स्पष्ट केलंय, ‘गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहतील, अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच आमच्या या खासगी प्रवासात मीडिया आणि जनतेनं आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचं हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद.’
गेल्या काही महिन्यांपासून आदिनाथ आणि उर्मिला यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या. मात्र त्यावर दोघांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता सोशल मीडियावर विभक्त होत असल्याची पोस्ट लिहून दोघांनीही चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
घटस्फोटाची चर्चा का सुरू झाली?
आदिनाथचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या प्रमोशनदरम्यान उर्मिला कुठेच त्याच्यासोबत दिसली नव्हती. इतकंच नव्हे तर तिने सोशल मीडियावरही कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. त्याचवेळी उर्मिलाच्या वाढदिवशी आदिनाथनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली नव्हती. इतकंच नव्हे तर उर्मिलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आदिनाथला अनफॉलो केलं की काय अशीही चर्चा होती.