IPL 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण?Image Credit source: IPL/BCCI
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे मोजून दोन सामने शिल्लक आहेत. प्लेऑफचे सामने 26 मे पासून सुरू होणार आहेत. क्वॉलिफायर 1 सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामना चंदीगड येथे होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून क्वॉलिफायर 1 फेरीसाठीचे दोन संघ ठरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. कारण या दोन्ही संघांनी टॉप 2 मध्ये स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे क्वॉलिफायर 1 मध्ये खेळण्याची संधी या दोन संघांना मिळणार आहे. हा सामना 26 मे रोजी होणार आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांचे प्रत्येकी 18 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत आरसीबी संघ पुढे आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.783 आहे. तर गुजरात टायटन्सचा नेट रनरेट हा +0.695 आहे.
आरसीबी गुजरात टायटन्स सामना रद्द झाला तर…
आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफचे सामने 26 मे पासून रंगणार आहेत. पण या सामन्यांवर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे. कारण या दरम्यान भारतात पावसाचे वारे वाहण्यास सुरूवात होते. त्यामुळे मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडला तर हा सामना रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? असा प्रश्न आहे. कारण क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामन्यासाठी राखीव दिवस नाही. फक्त अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामने त्या दिवशीच संपवले जातात. त्यासाठी 120 मिनिटांचा अवधी असतो. पण तसं झालं नाही तर आरसीबीला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.
जर तरचं गणित समजून घ्या
आरसीबी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीचं तिकीट आरसीबीला मिळेल. तर गुजरात टायटन्सला क्वॉलिफायर 2 सामन्यात खेळावं लागेल. असंच एलिमिनेटर फेरीत गणित असेल. सनरायझर्स हैदराबाद आणि चौथ्या संघात हा सामना होईल. या सामन्यात पाऊस पडला आणि रद्द झाला तर सनरायझर्स हैदराबादला क्वॉलिफायर 2 चं तिकीट मिळेल. आता क्वॉलिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. या सामन्यातही तशीच स्थिती ओढावली तर मात्र गुजरात टायटन्सला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. अंतिम फेरीत गुजरात टायटन्स आणि आरसीबीचा सामना होईल. या सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव आहे. राखीव दिवशीही सामना झाला नाही तर चषक विभागून दिला जाईल.