लंडन : टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यानं 15 वर्ष 99 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. इंग्लंड विरोधातील दुसऱ्या टी 20 सामन्यात 4 जुलै रोजी वैभवने पहिल्या डावात 14 धावा केल्या. वैभवनं त्या खेळीमध्ये 10 बॉल खेळले. वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करु शकला नाही, त्यामुळं तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याला संधी मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वैभव सूर्यवंशी संदर्भात टीम मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना म्हटलं की, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला योग्य संधी दिली पाहिजे, त्यानंतर तो कशी कामगिरी करतो ते पाहायला पाहिजे. वैभवला संघात कायम ठेवलं पाहिजे. वैभवला ब्रेक किंवा आराम देण्यात काही अर्थ नाही. वैभवला आरामाची गरज नाही तो पूर्ण वर्षभर खेळू शकतो.
लक्ष्मण शिवरामकृष्णन म्हणाले की, एक फलंदाज म्हणून वैभव सूर्यवंशीला गोलंदाजांना आवश्यक असलेल्या फिटनेसची गरज नाही. दीर्घकाळ फलंदाजी केल्यानं त्याची एकाग्रता आणि मानसिक क्षमता वाढेल. ज्यामुळं तो दीर्घकाळ खेळावर लक्ष केंद्रीत करु शकतो.
पुढील 20 वर्षांची गुंतवणूक
लक्ष्मण शिवरामकृष्णन पुढे म्हणाले की “एकदा तुम्ही वैभवला खेळवण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला त्याला पुरेशी संधी द्यावी लागेल. लक्षात ठेवा वैभव सूर्यवंशी 20 वर्षांची गुंतवणूक आहे. सध्या वैभवला प्रशिक्षक, कर्णधार आणि इतर खेळाडूंचा आधार आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीनं काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे, त्याला संधी देणं सुरु ठेवलं पाहिजे, असं शिवरामकृष्णन म्हणाले.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी 20 सामन्यांपैकी तिसरा सामना 7 जुलै रोजी खेळणार आहे. ही मॅच नॉटिंघममध्ये ट्रेंट ब्रिजमध्ये खेळला जाणार आहे.