सोहैल खानने अखेर सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण; म्हणाला “मी तिच्यावर खूप प्रेम करायचो पण..” – Marathi News | Sohail khan reveals real reason behind divorce with seema sajdeh what went wrong


अभिनेता आणि निर्माता सोहैल खान सध्या ‘अलायन्स’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या शोमध्ये त्याची नुकतीच वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली. विशेष म्हणजे आधीपासूनच या शोमध्ये त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेहसुद्धा स्पर्धक आहे. ‘अलायन्स’च्या माध्यमातून सोहैल आणि सीमा घटस्फोटानंतर पुन्हा एकाच छताखाली आले आहेत. जेव्हा शोमध्ये सोहैलची एण्ट्री झाली, तेव्हा त्याला पाहून सीमासुद्धा खुश झाली होती. या दोघांना अशा पद्धतीने पुन्हा एकत्र पाहून शोमधील इतर स्पर्धक आणि चाहतेसुद्धा खुश झाले आहेत. यादरम्यान सोहैल खान त्याच्या घटस्फोटाच्या कारणांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. सोहैलने स्वत: घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून त्याच्यामुळे संसार मोडल्याची कबुली दिली आहे.

घटस्फोटामागील कारण

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेव्हा सीमा सजदेहची एण्ट्री झाली, तेव्हा सोहैलने तिच्यासाठी ग्रीन-टी बनवली होती. तेव्हा सूत्रसंचालक निखिल चिन्नपा त्याला विचारतो की, “एक स्त्री घराची वाईट वाट लावू शकते आणि घर चांगलंही करू शकते. तुझ्या संसारात कोणाचा हात होता?” त्याचं उत्तर देताना सोहैल खान म्हणाला, “त्यावेळी माझं काम ठीक चालत नव्हतं. त्यामुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती. माझ्या याच वागण्यामुळे मी तिला गमावलं आहे. तिच्यावर मी खरंच खूप प्रेम करायचो. सीमा माझ्या दोन मुलांची आई आहे. त्यामुळे आता माझ्या मनात तिच्याविषयी प्रेमापेक्षा जास्त आदर आहे.”

आजही सीमाकडे घराची चावी

सोहैल खानने या शोमधील स्पर्धक झैद दरबारशी बोलतानाही त्याच्या मुलांसोबतच्या आणि सीमासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने सांगितलं की निर्वाण आणि योहान ही दोन्ही मुलं सध्या त्याच्या सोबतच राहतात. तर सीमा मुलांना भेटण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा त्याच्या घरी जाते. सीमाकडे आजही त्याच्या घराची चावी असल्याचा खुलासा सोहैलने यावेळी केला.

सोहैल खान आणि सीमा सजदेह या दोघांची पहिली भेट चंकी पांडे यांच्या साखरपुड्यात झाली होती. सीमाला पाहताच क्षणी सोहैल तिच्या प्रेमात पडला होता. दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने सीमाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. अखेर कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन सीमा आणि सोहैलने पळून लग्न केलं होतं. आधी आर्य समाज मंदिरात दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं, त्यानंतर निकाहनामा वाचला. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर 2022 मध्ये सोहैल आणि सीमा विभक्त झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *