Last Updated:
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या एका तरुणाने एक रक्तरंजित कांड केला आहे. आरोपीनं एकाच रात्रीत तब्बल सहा जणांची हत्या केली आहे.
लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या एका तरुणाने एक रक्तरंजित कांड केला आहे. आरोपीनं एकाच रात्रीत तब्बल सहा जणांची हत्या केली आहे. त्याने पीडित मुलीला देखील गळा चिरून संपवलं आहे. या रक्तरंजित थराराने संपूर्ण देश हादरला आहे. सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याने सूड भावनेतून त्याने हे हत्याकांड घडवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात घडली असून राजकुमार असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात 17 वर्षीय मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. अटकेनंतर आरोपीला न्यायालयाकडूंन जामीन मंजूर झाला. मात्र जामीन मिळल्यानंतरही आरोपीची पीडिता आणि तिच्या कुटुंबाप्रतीची सूडाची भावना संपली नव्हती . या सूडाच्या भावनेनेच आरोपीने कुटुंबाला लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे .
एका रात्रीत सहा जणांची हत्या…
आरोपी राजकुमार शुक्रवारी रात्री थेट मुलीच्या घरी पोहोचला. त्याने धारदार शस्त्राने पीडित मुलगी, तिची आई आणि आजीवर हल्ला करून त्यांची हत्या केली. मुलीला घराबाहेर नेऊन तिच्यावर पुन्हा लैगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे . पण या दाव्याची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होईल.
पीडित कुटुंबाची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःच्या घरी परतला. घरी येऊन त्याने पत्नी सरिता आणि आपल्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या केली. हत्याकांडानंतर स्वतःच्या वडिलांना फोन करून सगळी माहिती दिली आणि स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचे कळवले . वडिलांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी फरार झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी आणि विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
प्राथमिक तपासात संपूर्ण हत्याकांड सूडाच्या भावनेतून घडल्याचे दिसून येते. पण आरोपीने स्वतःची पत्नी आणि मुलांचा खून का केला? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आरोपीने घडवलेला सगळा प्रकार कट रचून केला की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता म्हणून केला? याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. पण एकाच रात्रीत घडलेल्या या सहा जणांच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे .
Hyderabad,Telangana
लैंगिक अत्याचार करून तुरुंगात गेला, बाहेर येताच पीडित तरुणीसह 6 जणांना दिला भयंकर मृत्यू, स्वत:च्या पत्नीलाही सोडलं नाही
