Last Updated:
शनिवारी रात्री दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की दयानंद यांचा स्वतःवरील ताबा सुटला
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एक अंगावर काटा आणणारी आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादाचा राग डोक्यात घालून एका पतीने संपूर्ण घरच पेटवून दिले. या भीषण आगीत घरातील संपूर्ण संसार तर जळून खाक झालाच, पण घरात झोपलेले तीन मुके जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील सावित्रीबाई फुले वसाहतीत ही घटना घडली. इथे दयानंद कसबे आणि त्यांची पत्नी मोहिनी कसबे राहतात. शनिवारी रात्री दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की दयानंद यांचा स्वतःवरील ताबा सुटला. रागाच्या भरात त्यांनी घरात असलेले कपडे आणि इतर साहित्य गोळा केले आणि त्याला थेट आग लावून दिली.
बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण घर धुराच्या आणि आगीच्या विळख्यात सापडले. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी दयानंदने घराला आग लावली, तेव्हा घरात तीन पाळीव मांजरी होत्या. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे या तिघांचाही जीव गुदमरला आणि त्यांचा मृत्यू झाला.
या गुन्हेगारी कृत्यामुळे घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य आणि संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पत्नी मोहिनी दयानंद कसबे (वय ३६) यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपी पती दयानंद कसबे (वय ३८) याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
Pune,Maharashtra
पुण्यात मध्यरात्री पत्नीशी कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रागाच्या भरात माचिस काढली अन्…घरात आगीचा भडका पाहून सगळेच हादरले
