गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडमोडी घडताना पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिवसेनेची वाट धरली होती. या सर्व राजकीय घडामोडींनंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पत्रकारांनी आज आमदार आदित्य ठाकरे यांना शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं मत स्पष्टपणे मांडत असतो. आता सगळीकडे लोक बोलायला लागलेली आहेत, लोकं व्यक्त होत आहे, ते राग व्यक्त करत आहेत. महागाई, वीज, पाणीटंचाई यावर लोक व्यक्त होत आहे.
दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आज जे कुठचेही पक्ष असतील, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील अधिकृतरित्या किंवा अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत असतील. त्यांना एवढच विचारत आहे की, जी लोकं राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणार का? जंतर मंतरला अभिजीत दिपले आणि सोनम वांगचूक आंदोलन करत आहेत. ते या देशासाठी आंदोलन करत आहेत. तुम्ही त्याच्या विरोधात भाजपसोबत जाणार का? सगळेच जे लोक भाजपसोबत जाण्याचा विचार करत आहे त्यांना हा माझा सवाल आहे.’
दरम्यान, गेल्या काही काळापासून शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांची भेटही झाली असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप याबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.