हवामान विभागाच्या अंदाजानुसार अनेक भागांमध्ये ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशातील 10 राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि धुळीच्या वादळाचा इशारा
दिल्ली आणि एनसीआर परिसरात हवामान आक्रमक स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून दुपारनंतर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. काळे ढग दाटून येण्याबरोबरच जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये दुहेरी संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मेरठ, गाझियाबाद, गौतमबुद्ध नगरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळीची आंधी आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. येथे ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने ‘थंडरस्क्वॉल’ स्वरूपाचे तीव्र वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडणे आणि वीज खांबांचे नुकसान होण्याचा धोका आहे.
राजस्थानमध्ये वादळाचे सर्वाधिक तीव्र स्वरूप पाहायला मिळू शकते. पूर्व आणि पश्चिम राजस्थानमध्ये ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जैसलमेर आणि बाडमेरसारख्या सीमावर्ती भागांमध्ये धुळीचे मोठे वादळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बिहारमध्ये चक्रीवादळी परिसंचरणाच्या प्रभावामुळे ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ईशान्य बिहारमध्ये वीज पडण्याचा उच्चस्तरीय इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वादळ आणि मेघगर्जना सुरू असताना मोकळ्या शेतात किंवा झाडाखाली आश्रय न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे मध्य प्रदेशात मान्सूनचा प्रभाव वाढला आहे. भोपाळ, इंदूर, उज्जैनसह 31 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेशात ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याबरोबरच जोरदार पाऊस आणि वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे तापमानात लक्षणीय घट होऊ शकते.
पश्चिम बंगालमध्ये मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम भागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोलकात्यासह गंगेच्या खोऱ्यातील भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि सतत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा तसेच डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका वाढला आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किनारी आणि अंतर्गत कर्नाटकात मान्सून सक्रिय राहणार आहे. किनारी भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि मुसळधार पाऊस पडू शकतो. समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही दिवसभर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
केरळमध्ये मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय असून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
पंजाब आणि हरियाणामध्ये दुपारनंतर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात तर काही भागांत हा वेग 60 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. धुळीच्या वादळासह होणारा पाऊस शेतातील उभ्या पिकांवर परिणाम करू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने नागरिकांना वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसादरम्यान सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला असून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रासाठी 21 तास अत्यंत महत्त्वाचे, देशातील 16 राज्यांना अलर्ट; एकाच वेळी येणार वादळ, मुसळधार पाऊस अन् धुळीचे वादळ