Kajal Agrwal : बॉलिवूड आणि दाक्षिणात्त्य सिनेमा यांची नेहमीच तुलना होते. दाक्षिणात्त्य सिनेमांची कथा, त्यांचे चित्रिकरण तसेच दिग्दर्शनाची नेहमीच चर्चा होते. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं चित्रपट समिक्षक नेहमीच म्हणतात. दरम्यान, दाक्षिणात्त्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये नेमका काय फरक आहे? तसेच बॉलिवूडने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून काय शिकायला हवं, याबाबत काजल अग्रवाल या अभिनेत्रीने मनमोकळेपणाने सांगितले. तसेच तिने दिग्गज अभिनेता सलमान खानची एक वाईट सवयही सांगितली आहे.
बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकायला हवं?
आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या फारशी लाईमलाईटमध्ये नाही. परंतु तिने याआधी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे. विशेष म्हणजे आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्मात्यांनी बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई केलेली आहे. याच काजल अग्रवालने शुभांकर मिश्रा यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये नेमकं काय चुकतं याविषयी सविस्तर सांगितलं. “सर्वात पहिली बाब म्हणजे बॉलिवूडने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून वक्तशीरपणा शिकला पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीत वेळेवक कुठलीच गोष्ट होत नाही. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत मात्र सर्वकाही वेळेवरच करण्याची सवय आहे. मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर जायला आवडते. पण बॉलिवूडमध्ये वक्तशीरपणा अजिबात नाही,” अशी खंत काजल अग्रवालने बोलून दाखवली.
सलमान खानने सर्वाधिक वाट पाहायला लावली
तसेच पुढे तुला एखाद्या अभिनेत्यामुळे फार वेळ थांबावं लागलेलं आहे का? असा सवाल तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने थेट सलमान खानचे नाव घेतले. “सलमान खानने मला सर्वाधिक वाट पाहायला लावलेली आहे. मला याची सवय नव्हती. सलमान खान उशिरा यायचा. मला मात्र आश्चर्य वाटायचं. सलमान खान दुपारी किंवा संध्याकाळी यायचा. त्यामुळे मला सेटवरच जीम करावी लागायची. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत असलेल्या वेळ पाळण्याच्या शिस्तीची सवय आहे,” असं काजल अग्रवालने सांगितलं.
तसेच आजकाल महिला कलाकारांना शोभतील असे, व्यापक भूमिका असलेल्या लिखाण चित्रपटांसाठी केले जात आहे, अशी भावनाही तिने व्यक्त केली.