मुंबई : बीड जिल्ह्यातील (Beed) बहुचर्चित ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह सोसायटीतील घोटाळ्यानंत येथील ठेवादारांच्या ठेवी अद्यापही मिळालेल्या नाहीत. या पतसंस्थेमधील ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे तातडीने परत मिळवून देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. यासंदर्भात विधान भवन येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांसह बीडमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ठेवीदारांचे हित जपण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षण (एमपीआयडी) कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. हा कायदा अधिक सक्षम करून त्याअंतर्गत वित्तीय संस्था किंवा बँकांच्या मालमत्ता जप्त करणे आणि त्यांचा लिलाव करणे, ही प्रक्रिया जलद करावी. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार क्लिष्ट आणि दीर्घकालीन प्रक्रियेला यंत्रणांना सामोरे जावे लागते. या प्रक्रियेत बदल करून, केंद्र शासनाच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या धर्तीवर अशा प्रकरणातील जप्तीच्या कार्यवाहीसाठी राज्यातही व्यवस्था तयार करावी. त्यामुळे मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई जलद गतीने करणे शक्य होईल.
बँकेच्या किंवा संस्थेच्या सर्व मालमत्तांचे अचूक मूल्यांकन करून, ज्या मालमत्तांचे मूल्यांकन सर्वाधिक आहे, त्यांचा प्राधान्याने विक्री केली जावी. मूल्यांकनानुसारच मालमत्तांची विक्री करून पारदर्शक पद्धतीने हा निधी थेट गुंतवणूकदारांना दिला जावा. या संपूर्ण प्रकरणाचा तिढा तातडीने सुटण्यासाठी गृह विभागाने अंमलबजावणी संचालनालयासोबत (ईडी) एकत्र बैठक घ्यावी आणि या कायदेशीर व तांत्रिक बाबींवर तातडीने कोणती पावले उचलता येतील, याबाबतची ठोस कार्यपद्धती निश्चित करावी, असेही आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आणि इतर भागांतील पीडित ठेवीदारांची बाजू मांडत या प्रक्रियेत गती आणण्याची विनंती लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बीड जिल्हाधिकारी, सरकारी वकील यांनी बैठकीत सहभाग घेतला.
42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद
मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.
हेही वाचा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून