15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरात या राष्ट्रीय सणाची तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये देशभक्तिपर कार्यक्रमांचे नियोजन सुरू असते. विद्यार्थ्यांकडून देशभक्तिपर गाण्यांवर सादरीकरणासाठी सराव केला जातो. अशा वेळी दरवर्षी हमखास ऐकू येणाऱ्या गाण्यांमध्ये ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गाण्याचा समावेश असतो. भारतीय सैनिकांचे शौर्य, देशभक्ती आणि बलिदानाची भावना प्रभावीपणे मांडणाऱ्या या गाण्याने गेली अनेक वर्षे प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ’23 मार्च 1931 : शहीद’ या चित्रपटातील हे गाणं गायक उदित नारायण आणि भूपिंदर सिंह यांनी गायले होते. चित्रपटात बॉबी देओल आणि सनी देओल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या गाण्यामुळे भूपिंदर सिंह यांच्या कारकिर्दीला नव्याने ओळख मिळाली आणि त्यांची गंभीर, भावस्पर्शी गायकी आजही तितक्याच आदराने स्मरणात ठेवली जाते.
पंजाबमधील संगीतघराण्यात झाला जन्म
भूपिंदर सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील प्राध्यापक नत्था सिंह हे उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांनीच भूपिंदर यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण दिले. मात्र वडिलांच्या कडक शिस्तीमुळे सुरुवातीच्या काळात त्यांची संगीतावरील आवड काहीशी कमी झाली होती. तरीही त्यांच्या अंगी असलेल्या नैसर्गिक प्रतिभेमुळे त्यांनी संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात दिल्ली येथील ऑल इंडिया रेडिओमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून झाली. त्यांच्या गझला प्रथम आकाशवाणीवर प्रसारित झाल्या आणि नंतर दूरदर्शनवरही झळकल्या. याच काळात एका संगीत कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांनी त्यांची गायन ऐकले. त्यांच्या आवाजाने प्रभावित झालेल्या मदन मोहन यांनी त्यांना मुंबईला बोलावले आणि तेथून हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली.
आजही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे गाणं देशभरात घुमते आणि त्या गाण्यासोबत भूपिंदर सिंह यांचा भारदस्त, भावपूर्ण आवाज प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागवून जातो. म्हणूनच त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या सुरांचा वारसा आणि संगीतप्रेमींवरील प्रभाव आजही तितकाच जिवंत आहे.