आजपासून टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारतीय संघ आयर्लंड मध्ये दोन T20 सामने खेळणार आहे. त्यानंतर तिथून टीम इंग्लंड दौऱ्यावर जाईल. आज आयर्लंड विरुद्ध पहिला T20 सामना आहे. यावेळी सगळ्यांच लक्ष फक्त दोन गोष्टींकडे लागलं आहे. श्रेयस अय्यरचं T20 मध्ये भारतीय संघाकडून कॅप्टन म्हणून पदार्पण आणि वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. वैभव सूर्यवंशीला आज डेब्युची संधी मिळेल का? हा कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. आतापर्यंतचा वैभवचा सिनियर टीम इंडिया पर्यंतचा प्रवास खूप दमदार राहिला आहे. या खेळाडूने आपल्या कामगिरीने त्याच्याविषयी बऱ्याच अपेक्षा निर्माण केल्या आहेत. पहिल्या चेंडूपासून हा प्लेयर आक्रमक होऊन खेळतो. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये त्याने 776 धावा फटकावल्या. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात पहिल्या चार सामन्यात फ्लॉप ठरला. पण फायनलमध्ये 29 चेंडूत 94 धावा तडकावल्या. त्यामुळेच आज हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशीला संधी देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी जे संकेत दिलेत, त्यावरुन तरी वैभव सूर्यवंशीला आज डेब्यू करण्याची संधी मिळेल याची शक्यता कमी वाटत आहे. जे खेळाडू चांगले खेळतायत त्यांची किंमत मोजून वैभवला संधी मिळणार नाही हे सितांशु कोटक यांनी स्पष्ट केलय. वैभव सूर्यवंशीला आज आयर्लंड विरुद्ध संधी मिळाली, तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा क्रिकेटर ठरेल. वैभव आता फक्त 15 वर्षांचा आहे. वैभव सूर्यवंशी ओपनिंगला येतो. सध्या या जागेसाठी टीम इंडियात तीन खेळाडू आहेत.
हा त्यांच्यावर अन्याय ठरेल
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन. हे तिघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मार्च महिन्यात झालेला T20 वर्ल्ड कप भारताला जिंकवून देण्यात या तिघांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे वैभव सूर्यवंशीसाठी या तिघांपैकी एकाला वगळणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. वैभव सूर्यवंशीला खेळवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. पण त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करणं गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरसाठी सोपं नाही. कारण वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियातील सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. अशावेळी वैभवसाठी कोणाला बाहेर बसवायचं हा मोठा प्रश्न आहे.
टीम इंडियाचे बॅटिंग कोच काय म्हणाले?
“वैभव हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. या बद्दल कुठलीही शंका नाही. आयपीएल आणि अन्य सामन्यात त्याने जे प्रदर्शन केलं, त्यातून त्याची नैसर्गिक क्षमता दिसून आली. आयपीएलमध्ये त्याने जोफ्रा आर्चर आणि अन्य वेगवान गोलंदाजांचा सामना केला. तो कशाचीही चिंता न करता खेळतो” असं सितांशु कोटक म्हणाले.