Sonakshi SInha Post on Jantar Mantar Protest:अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पुन्हा एकदा सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर 20 जुलै रोजी झालेल्या ‘संसद चलो’ आंदोलनानंतर तिने सोशल मीडियावर काही अस्वस्थ करणारी छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये पोलिसांचा लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि जखमी विद्यार्थ्यांचे दृश्य दिसत आहे. या पोस्टनंतर अनेकांनी सोनाक्षीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
’20 जुलै… देशाचंही मन तुटलं’
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर 13 छायाचित्रे शेअर करत लिहिले, “20 जुलै… या दिवशी अनेकांची हाडं मोडली आणि संपूर्ण देशाचं मनही तुटलं. हा दिवस लक्षात ठेवा.” पोस्टमधील छायाचित्रांमध्ये जखमी विद्यार्थी, पोलिसांची कारवाई आणि आंदोलनातील तणावपूर्ण प्रसंग दिसत आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.हे आंदोलन करणारे विद्यार्थी NEET पेपर लीक प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
याआधीही सोनाक्षीने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तिने लोकांना सोनम वांगचुक आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. लोकशाहीत प्रत्येकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे, असे तिचे मत होते. तसेच, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेण्याच्या पद्धतीवरही तिने प्रश्न उपस्थित करत सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, अशी मागणी केली होती.
‘तुमच्या धाडसाला सलाम’
सोनाक्षीच्या पोस्टवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्याने लिहिले, “सोनाक्षी, तुमच्या धाडसाला तोड नाही. सगळे गप्प असताना तुम्ही आवाज उठवलात.” तर दुसऱ्याने “खरं सोने म्हणजे सोनाक्षी सिन्हा” असे म्हणत तिचे कौतुक केले. सोनम वांगचुक यांच्या टीमनेही सोनाक्षीच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्यांनी कमेंटमध्ये लिहिले, “तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.”
‘मी आता गप्प राहू शकत नाही’
यापूर्वी शेअर केलेल्या व्हिडीओ संदेशात सोनाक्षी म्हणाली होती, “मी याआधी अशा प्रकारचं विधान कधीच केलं नव्हतं. पण आता या मुद्द्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सोनम वांगचुक यांनी देशासाठी मोठं काम केलं आहे. त्यांचे योगदान सर्वांनाच माहीत आहे. ते उपोषण करत आहेत. त्यांनी काहीही खाल्लेलं नाही. ते हे सर्व स्वतःसाठी नाही, तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या भविष्यासाठी लढत आहेत. व्यवस्था योग्य प्रकारे काम करत नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक जण अजूनही शांत आहेत, पण मी गप्प राहू शकत नाही. जे होईल ते होईल.” असं ती म्हणलेली. “सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद सुरू करावा, अशी मागणी करत सोनाक्षी म्हणाली, “कोणीही त्यांचं ऐकत नाही. कोणालाच याची काळजी नाही. संवादासाठीही कोणी तयार नाही. त्यामुळेच आता बोलण्याची वेळ आली आहे असं मला वाटलं. मी राष्ट्रविरोधी नाही.” असंही ती म्हणली होती.