Shreyas Iyer Ind vs Eng 5th T20 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सुरुवात सुमार राहिली. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी तब्बल सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 56 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला.
या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर स्पष्टपणे नाराज दिसला. सामन्यानंतर बोलताना त्याने मालिकेतील दारुण पराभवाची कारणे सांगितली. अय्यरच्या मते, निर्णायक क्षणी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. महत्त्वाच्या क्षणी चुका झाल्या आणि त्याची मोठी किंमत संघाला मोजावी लागली. तसेच आगामी मालिकांमध्ये या चुका सुधारून दमदार पुनरागमन करण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला.
भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर नेमकं काय म्हणाला?
पाचव्या टी-20 सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, “यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. विशेषतः इथल्या परिस्थितीबद्दल. मला असं वाटतं की सगळा खेळ परिस्थितीशी जुळवून घेण्याचाच आहे. पहिल्या सामन्यापासून परिस्थिती सतत बदलत राहिली. खेळाडू म्हणून आपल्याला यातून शिकावं लागेल.
पुढे तो म्हणाला, सामने जिंकण्यात क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. जेव्हा तुम्ही परदेशात खेळायला येता, तेव्हा मैदानाचे आकार आणि बाजू वेगवेगळ्या असतात. तिथे जुळवून घेणं गरजेचं असतं. विशेषतः ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप छान होती, तिथे कदाचित आम्ही थोडी चलाखी दाखवून फलंदाजांना चकवू शकलो असतो. पण आमच्याकडून काही झेलही सुटले. जर ते झेल पकडले असते, तर आम्ही कदाचित 220-225 धावांचा पाठलाग करत असतो. दुर्दैवाने आम्हाला ती संधी मिळाली नाही.
शेवटी अय्यर म्हणाला की, आम्ही लागोपाठ विकेट्स गमावल्या. मला असं वाटलं की त्यांच्या गोलंदाजांनी रणनीतीची अगदी अचूक अंमलबजावणी केली. शिवाय, ते इथे खूप क्रिकेट खेळले आहेत. बटलरने अप्रतिम फलंदाजी केली आणि त्यानंतर हॅरी मैदानात आला.. आम्ही काही झेल सोडले आणि त्यामुळे सामन्याची लय बदलू शकली असती.”
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर , इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 4-0 ने पराभूत करत पाचवा टी-20 सामना 56 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत तीन गडी गमावून 257 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 201 धावाच करू शकला. त्यामुळे भारताने आपली सलग दुसरी टी-20 मालिका गमावली. विश्वविजेता भारत आता टी-20 मधील आपले अव्वल स्थान गमावेल. पुढील आठवड्यात, इंग्लंड आयसीसी क्रमवारीत भारताला मागे टाकून टी-20 मधील अव्वल संघ बनेल.
हे ही वाचा –