Sanjay Raut-Nitesh Rane : संजय राऊत यांनी नितेश राणेंना पत्र लिहून घातली साद, तुम्हाला वाटेल ही नव्या मैत्रीची सुरुवात पण.. – Marathi News | Sanjay Raut written letter to minister bjp leader Nitesh Rane to join Uddhav Thackeray shivsena save prabhu Shriram andolan


महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री नितेश राणे आणि खासदार संजय राऊत हे परस्परांवर तोंडसुख घेण्याची, ऐकमेकांना आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागच्या महिन्यात एक आर्श्चयकारक घटना घडली होती. संजय राऊत यांनी चक्क नितेश राणे यांचं कौतुक केलं होतं. संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नितेश यांची मुक्तकंठाने स्तुती केली होती. राज्यातील उत्तम काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी नितेश एक असल्याचं राऊत म्हणाले होते. राऊत यांनी पहिल्यांदाच नितेश राणे यांची तोंडभरून स्तुती केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. आता संजय राऊत यांनी चक्क नितेश राणे यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र लिहिलं म्हणून तुम्हाला असं वाटू शकतं की, हे दोन नेत्यांमध्ये मनोमिलन होतय. पण असं नाहीय. संजय राऊत यांनी नितेश राणे यांना ठाकरे गटाच्या श्रीराम वाचवा आंदोलनात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. संजय राऊत यांनी नितेश राणे यांना लिहिलेलं हे पत्र उपरोधिक आहे, हे वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं.

“आपलं कुटुंब हे जवळपास 10 वर्ष काँग्रेसमध्ये होतं. काँग्रेसमध्ये असताना आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वीर सावरकर, हिंदुत्व या बद्दल आपण आपली मत परखडपणे मांडली. भाजपात येताच आपलं मन परिवर्तन झालं. लिव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयांवर सतत भूमिका मांडून हिंदुंच्या मतांना सतत फोडणी देण्याचा प्रयत्न आपण केलात. हिंदुंच्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरलात. आपल्या समर्थकांनी ‘हिंदू गब्बर’ अशी उपाधी आपल्याला बहाल करुन गौरव केला आहे. सध्या हिंदुंचे एकमेव तारणहार आपणच असल्याची प्रतिमा तयार झाली आहे” संजय राऊत यांच्या पत्रातील शब्दांमधून हा उपरोधिकपणा लक्षात येतो.

भाजपतील महम्मद गजनींनी 40 दिवसात 70 वेळा राम मंदिर लुटलं

“कोट्यवधी हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील लुटीबाबत आपण आवाज उठवावा ही सकल हिंदू समाजातर्फे आपणास विनंती करतो. राम मंदिरात दानपेटीतून आतापर्यंत 550 कोटींची लूट झाल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात भाजपचे मोठे नेते सहभागी आहेत. इतिहासात महम्मद गजनीने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं. पण भाजपतील महम्मद गजनींनी 40 दिवसात 70 वेळा राम मंदिर लुटण्याचा विक्रम केला. शिवाय इतरही गुन्हे मंदिरात घडत आहेत या बाबत आपण आवाज उठवावा” अशी मागणी संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

“सकल हिंदू समाजाला सोबत घेऊन शिवसेना (ठाकरे) ‘प्रभू श्रीराम वाचवा’ लढा उभारत आहे. मुंबईत सकल हिंदू समाजाच्या आंदोलनात आपल्यासारख्या ‘गब्बर हिंदू’ने सहभागी व्हावे” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *