Purushottam Maas Katha Adhyay 11: ऋषीकन्येची तपश्चर्या आणि शिवकृपा, तरी ऋषीकन्या दुःखी!



Adhik Maas Story: सनातन धर्माच्या पवित्र परंपरांमध्ये पुरुषोत्तम मासाला अत्यंत श्रेष्ठ आणि कल्याणकारी मानले जाते. अधिकमास म्हणजे श्रीहरिची विशेष कृपा प्राप्त करण्याची दुर्मिळ संधी असे म्हणतात. या दिव्य काळात केलेले जप, तप, दान आणि व्रत साधकाचे जीवन पवित्र बनवते. त्याला भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नतीकडे जाण्याचे मार्गदर्शन करत असते. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 11 मध्ये आपण जाणून घेणार आहोत. एका तपस्विनी कन्येची कठोर साधना, शंभो महादेवाची कृपा आणि पुरुषोत्तम मासाचे महत्त्व आणि गूढ रहस्य

सूतजी म्हणाले, “मागील अध्यायात आपण पाहिले त्या कन्येने पुरुषोत्तम मासाचे महत्त्व बाजूला ठेवून स्वतःच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला. तिने भगवान शिवांसाठी कठोर तपश्चर्या सुरू केली.”

नारदांनी प्रश्न विचारल्यानंतर श्रीनारायण म्हणाले, “त्या ऋषी कन्येच्या मनात भगवान शिवांना पतीरूपाने प्राप्त करण्याची इच्छा होती. तिने अत्यंत कठोर तपस्या सुरू केली. ती कन्या अत्यंत दृढनिश्चयी आणि धैर्यवान होती. तिने ग्रीष्म ऋतूमध्ये पंचाग्नीच्या मध्यभागी बसून तप केले, हिवाळ्यात थंड पाण्यात उभी राहून साधना केली तर पावसाळ्यात मोकळ्या आकाशासाठी भिजून तपस्या सुरू ठेवली. अशा प्रकारे हजारो वर्षे तपश्चर्या करत असताना तिचे शरीर क्षीण झाले पण तिची भक्ती आणि संकल्प कधीही डळमळीत झाला नाही.”

तिची कठोर तपश्चर्या पाहून देवराज इंद्रही भयभीत झाले, कारण ती कन्या आपल्या ध्येयापासून किंचितही विचलित झाली नाही. अखेरीस तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवशंकर तिच्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन होताच ऋषी कन्येला अपार आनंद झाला. तिने अत्यंत आदराने त्यांना नमस्कार केला. महादेव म्हणजे दुःखांचा नाश करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे असे म्हणत भगवान शिवाची स्तुती केली. भगवान शंकर तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन म्हणाले, “हे तपस्विनी! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवे असेल तो वर माग.”

हे ऐकताच ती कन्या अत्यंत आनंदित झाली आणि वारंवार एकच वर मागू लागली, “हे प्रभो! मला पती द्या, मला पती द्या.” तिने आपली ही इच्छा पाच वेळा व्यक्त केली.

तेव्हा भगवान शंकर हसून म्हणाले, “हे तपस्विनी! तू पाच वेळा पती मागितला आहेस, म्हणून पुढील जन्मात तुला पाच पती प्राप्त होतील. ते सर्व वीर, धर्मज्ञ आणि गुणवान असतील.”

हे ऐकताच ती कन्या व्याकुळ झाली. तिने हात जोडून म्हटले, “हे प्रभू! जगात एका स्त्रीला एकच पती असतो. पाच पती असणे हे लोकपरंपरेच्या विरुद्ध आहे. कृपया मला असा वर देऊ नका ज्यामुळे माझी थट्टा होईल.”

तेव्हा महादेव थोडे गंभीर होत म्हणाले, “तपस्विनी! हे सर्व तुझ्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ आहे. तू पूर्वजन्मात महर्षी दुर्वासांचा अपमान आणि पुरुषोत्तम मासाचा अनादर केला. त्याच कारणामुळे तुला हे फळ मिळणार आहे. या जन्मात तुला पतीसुख मिळणार नाही, परंतु पुढील जन्मात तू योनीशिवाय जन्म घेशील, पाच पतींचे सुख तुला मिळेल आणि शेवटी तुला सर्वोच्च स्थान प्राप्त होईल.

शिव शंकर पुढे म्हणाले, “पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी आहे. जो याचे श्रद्धेने पालन करतो, त्याला सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. परंतु त्याचा अनादर केला तर वाईट परिणाम भोगावे लागतात.” असे सांगून भगवान शंकर अंतर्धानपावले. त्यांच्या निघून गेल्यानंतर ती कन्या अत्यंत दुःखी झाली, जणू एखादी हरिणी आपल्या कळपापासून वेगळी झाली असेल.

सूतजी म्हणाले, हे मुनिवर्य! अशा प्रकारे ही कथा आपल्याला शिकवते की, भक्ती आणि तपश्चर्येचे फळ नक्कीच मिळते, परंतु धर्माचे नियम आणि पुरुषोत्तम मासाचे महत्त्व समजून त्याचे पालन करणे देखील अत्यंत आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *