Manoj Jarange Patil on Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांचे गेल्या वीस दिवसापासून उपोषण सुरु असून सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21 दिवस आहे. एकंदरीत देशभरातून या आंदोलना पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे सरकारकडून मात्र अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याचे समोर आलं आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी भाष्य करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच केंद्र सरकारवर देखील हल्लाबोल केलाय. विद्यार्थ्याचं भविष्य टांगणीवर लागलं असेल आणि केंद्र सरकार एखाद्या मंत्र्याला इतकं सांभाळत असेल, यावरून असं वाटतंय कि सरकारला जाणून बुजून उद्रेक निर्माण करायचा आहे का? वीस दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि त्याची दखल सुद्धा केंद्र सरकारकडून घेतली जात नसेल, नीटमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान झालं आणि याला केंद्र सरकारचा मंत्री दोषी आहे. याला हटवायला काय अडचण आहे? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
जनता किंवा विद्यार्थी या देशाचं भविष्य आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. यामुळे प्रधानमंत्री यांनी शिक्षण मंत्र्यांना का ठेवावं? शिक्षण विभागाचा सगळा बोजवारा उडाला आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात, जर देशाच्या वतीने राजीनामा मागितला जात असेल आणि ते सुद्धा घेतला जात नाही मग सरकारसाठी काय महत्त्वाचा आहे, हे जनतेने ठरवून घेणे गरजेचे आहे. सरकारला त्यांच्यासाठी मंत्री महत्वाचे या देशातील जनता किंवा तरुण गरजेचे नाहीत का? असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. पंतप्रधानांनी त्याला का सांभाळावं? असा प्रश्न विचारात केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला आपण भेट देणार का असे विचारले असता सोनम वांगचुक यांना आमची साथ असणार आहे. असे मनोज जरांगे म्हणाले.
सीजेपीचे आंदोलन, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ 20 जूनपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. वांगचुकदेखील त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचशी केल्यानंतर सीजेपीची स्थापना झाली.
वांगचुक यांनी 170 दिवस तुरुंगात घालवले
यापूर्वी वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जोधपूर तुरुंगात 170 दिवस घालवले होते. 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये उपोषणादरम्यान हिंसाचार भडकवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला, ज्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि 90 जण जखमी झाले. सरकारने वांगचुक यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप ठेवला. दोन दिवसांनंतर, 26 सप्टेंबर रोजी, त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (NSA) अंतर्गत ताब्यात घेऊन जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आले.
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला