Manoj Jarange Patil : विलास घुले प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं, परळीकरांचे ऐकून खोटे आरोप करू नयेत; मनोज जरांगे पाटलांची मागणी


Manoj Jarange Patil : बीड जिल्ह्यातील टाकळी गावातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे (Vilas Ghule Case) सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विलास घुले हत्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) केवळ वरवरचा तपास न करता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

घुले कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास जरांगे पाटील यांनी दिला. घुले प्रकरणाशी संबंधित एका महिलेने माध्यमांसमोर येऊन अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले होते. या सर्व घडामोडींनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.  

Beed Crime Investigation : एसआयटी एकतर्फी काम करू शकत नाही

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच्या एका प्रकरणाचा दाखला देत पोलिसांच्या आणि एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “यापूर्वी महादेव मुंडे प्रकरणात देखील एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र तिथे केवळ थातूरमातूर तपास झाला. या घुले हत्येच्या प्रकरणात एसआयटीला एकतर्फी काम करता येणार नाही. जर या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा दोषी असेल तर सत्य काय आहे ते समोर येईलच. कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईल.”

Manoj Jarange Patil Vs Dhananjay Munde : परळीवाल्यांचे ऐकून खोटे आरोप करू नका

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला. आम्ही परळीवाल्यांसारखे आरोपी लपवत नाही. त्यांनी खून करूनही तो केला नाही असं म्हटलं. पण तशी नियत आमची नाही. आम्ही मराठे कधीही असं वागत नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

घुले कुटुंबाला जर आमची मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण परळीवाल्यांचे ऐकून तुम्ही कोणावरही खोटे आरोप करू नका, असं जरांगे म्हणाले. 

Vilas Ghule Umesh Mane : उमेश मानेवर महिलेचे आरोप

दरम्यान, या प्रकरणात ज्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या उमेश मानेवर एका महिलेने आरोप केले आहेत. उमेश मानेने आपले आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केले, शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर नवरा आणि मुलांना मारून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. उमेश माने हा मयत विलास घुलेचा मित्र असून त्याला मारण्यासाठी आलेल्या लोकांनी मध्ये आलेल्या विलास घुलेला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *