IND VS ENG 5th T20 Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना 11 जुलै रोजी साऊथॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. चार सामने संपल्यानंतर टीम इंडिया मालिकेत 0-3 ने पिछाडीवर असून, शेवटचा सामना जिंकून नामुष्की टाळण्याचे मोठे आव्हान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर असणार आहे. या मालिकेत भारताची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तिलक वर्मा, ईशान किशन, शिवम दुबे यांच्यासह युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौथ्या टी-20मध्ये गोलंदाजीचाही फज्जा
मँचेस्टर येथे झालेल्या चौथ्या टी-20मध्ये भारताने इंग्लंडसमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडने अवघा एकच विकेट गमावत 14व्या षटकातच लक्ष्य गाठले. भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली आणि फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजीवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
वैभव सूर्यवंशीने तीन सामन्यांत केल्या फक्त केवळ 42 धावा
या मालिकेत मोठ्या अपेक्षांसह संधी मिळालेल्या वैभव सूर्यवंशीने तीन सामन्यांत केवळ 42 धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजी आधीच दबावाखाली असताना वैभवने संयमाने खेळण्याऐवजी प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची निराशाजनक कामगिरी पाहता अखेरच्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
उपकर्णधार तिलक वर्मावरही टांगती तलवार
उपकर्णधार तिलक वर्मा याचाही या मालिकेतील फॉर्म निराशाजनक राहिला आहे. चार डावांत त्याने केवळ 51 धावा केल्या आहेत. संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असूनही तो अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरही संघाबाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. तसेच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यालाही अखेरच्या सामन्यात बाहेर बसवले जाऊ शकते. त्याच्या जागी वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू सूर्यांश शेडगे याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शेडगेने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्या मालिकेत त्याने फलंदाजीत एक धाव केली होती, तर गोलंदाजीत एक विकेटही घेतली होती. अतिरिक्त वेगवान गोलंदाजीचा पर्याय मिळावा, यासाठी व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवू शकते.
भारताची संभाव्य प्लेइंग-11
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार) शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा.
मालिका वाचवण्याचे शेवटचे आव्हान
भारताने आतापर्यंत मालिकेत एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे साऊथॅम्प्टनमध्ये होणारा अखेरचा टी-20 हा केवळ औपचारिक सामना नसून संघाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनीही आतापर्यंत अपेक्षाभंग केल्याने टीम मॅनेजमेंट अखेरच्या सामन्यासाठी धाडसी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. आता या बदलांचा भारताच्या कामगिरीवर काय परिणाम होतो, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –