दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काल राजधानीत मोठ्या घडामोडी घडल्या. सीजेपीचे आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले होते. संसदेपासून 150 मीटर अंतरावर या आंदोलकांना रोखण्यात आलं. काल रात्री हे आंदोलक पुन्हा जंतर-मंतरवर परतले. रात्री आंदोलनास्थळावर मुसळधार पाऊस कोसळला. पोलिसांनी वीज पुरवठा देखील खंडीत केला. पण तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. आज सकाळपासून पुन्हा विद्यार्थी जमायला सुरुवात झाली आहे. आज देखील संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रातील मंत्र्यांनी इथं येऊन चर्चा करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. कालच्या पेक्षा अधिक विद्यार्थी आज दिल्लीत येतील असा दावा आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. काल संसद भवनाकडे मार्च काढून निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं.
सोमवारी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान 118 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. यामध्ये विशेष आयुक्त, सह-आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॅरिकेडींग करण्यात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, तो पर्यंत मैदान सोडणार नाही असं अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही कुठेही जाणार नाही
पोलिसांनी काल आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काल पोलीस आणि विद्यार्थी दोघे जखमी झाले. आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावं. आम्ही कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका अभिजीत दीपके यांनी घेतली आहे. ज्यांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यांना जंतर-मंतरवर जमण्याचं आवाहन दीपके यांनी केलं आहे. जंतर-मंतर परिसरात सोनम वांगचूक यांनी हे आमरण उपोषण सुरु केलं होतं. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आलेलं. शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर हे आंदोलन चिघळलं. काल मोठ्या संख्येने तरुणाई दिल्लीत रस्त्यावर उतरलेली.