BCCI ने अचानक नियम बदलला, त्या खेळाडूंच आता काही खरं नाही, थेट मॅचमधून संस्पेंड करणार | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


खरं तर देशात लवकरच 2026-27 डॉमेस्टीक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.तत्पुर्वी बीसीसीआयने खेळाच्या नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) क्रिकेटच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनंतर, बीसीसीआयने आपल्या देशांतर्गत स्पर्धांसाठीही नवीन नियम लागू केले आहेत. या बदलांचा बॉलर आणि विकेटकिपर आणि बहुदिवसीय सामन्यांच्या आयोजनावर सर्वाधिक परिणाम होईल.

बीसीसीआयने या नवीन नियमांविषयीची माहिती सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पाठवली आहे.आगामी देशांतर्गत हंगामात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पंच आणि सामनाधिकारी यांनाही या नवीन तरतुदींवर प्रशिक्षण दिले जात आहे.

बॉलर्सना बसणार झटका

सर्वात महत्त्वाचा बदल फ्रंट-फूट नो-बॉलशी संबंधित आहे. आता, जर एखादा गोलंदाज जाणूनबुजून फ्रंट-फूट नो-बॉल टाकताना आढळला, तर त्याला केवळ गोलंदाजीतून बाहेर काढले जाणार नाही, तर उर्वरित सामन्यासाठी निलंबितही केले जाईल.हाच नियम जाणूनबुजून धोकादायक बीमर (चेंडू जो टप्पा न पडता फलंदाजाच्या डोक्यावरून जातो) टाकण्यासही लागू होईल. पूर्वी, अशा प्रकरणांमध्ये गोलंदाजाला फक्त त्या डावात गोलंदाजी करण्यापासून रोखले जात असे, परंतु तो सामन्याचा भाग राहत असे आणि दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकत असे. आता असे होणार नाही.

ब्रेक दरम्यान कॅप्टनला मैदानात एंन्ट्री

प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दिवसाचे शेवटचे षटक सर्व परिस्थितीत पूर्ण केले जाईल. बीसीसीआयने बहुदिवसीय क्रिकेट, म्हणजेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता, दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडल्यास खेळ लगेच संपणार नाही. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विकेट पडल्यास सुद्धा, नवीन फलंदाजाला मैदानात येऊन शेवटचा चेंडू टाकावा लागेल. याचा अर्थ असा की, दिवसाचे शेवटचे षटक आता सर्व परिस्थितीत पूर्ण केले जाईल.

एकदिवसीय सामन्यांमध्ये, ड्रिंक्स ब्रेक दरम्यान कर्णधारांना मैदानात येता येईल. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, कर्णधार आपल्या खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी मैदानात जाऊ शकतील. पूर्वी यावर बंदी होती.

विकेटकिपरच्या नियमातही बदल

विकेटकिपरच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार विकेटकिपरना काहीसा दिलासाही मिळाला आहे. आता, गोलंदाजी करताना ते आपले हात यष्टीसमोर ठेवू शकतात, परंतु बॉल टाकताना त्यांचे हात विकेटमागे असणे बंधनकारक आहे. अलीकडे, असे अनेक प्रसंग घडले आहेत, जिथे बॉल टाकण्यापूर्वी विकेटकिपरचे ग्लोव्हज विकेटसमोर असल्याचे आढळून आले आणि पंचांनी नो-बॉल घोषित केला. अशा तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे हा या नवीन नियमाचा उद्देश आहे.

बीसीसीआयचा विश्वास आहे की, या बदलांमुळे देशांतर्गत क्रिकेटमधील शिस्त वाढेल, खेळाडूंसाठी नियम अधिक स्पष्ट होतील आणि सामन्याचे आयोजन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *