Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना


Abhijeet Dipke: जयपूरमध्ये, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी कानशिलात लगावली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून बेदम चोप दिला. अभिजीत नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आंदोलनादरम्यान, घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले. यानंतर, व्यासपीठावरून आपले मोबाईल फोन आणि सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत

आंदोलनात सहभागी झालेले तरुण ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो’ आणि ‘पेपरफुटी थांबवा’ यांसारख्या घोषणा असलेले फलक आणि तिरंगा घेऊन आले होते. काही महिला आपल्या लहान मुलांसोबत आंदोलनात सामील झाल्या. कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर कॉकरोच चित्र काढले आणि “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!” अशी घोषणा लिहिली. ज्या तरुणाने थप्पड मारली तो म्हणाला, “हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. मी जयपूरचा आहे. मी एक राष्ट्रवादी आहे. हा अभिजीत दीपक विनाकारण देशाची दिशाभूल करत आहे. ही पेपरफुटी केवळ एक निमित्त आहे.”

पोलिसांनी कानशिलात मारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके शहीद स्मारकाजवळ पोहोचताच तरुणांमध्ये झटापट झाली. दीपके यांना खांद्यावर उचलून आत नेले जात होते. यावेळी जमावातील दोन तरुणांनी त्यांना थप्पड मारली. सीजेपीच्या सदस्यांनीही त्या तरुणाला चोप दिला. कानशिलात मारणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.

20 जून रोजी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढू

कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलकांना संबोधित केले. त्यांनी घोषणा दिली, हिंदू-मुस्लिम राजकारण चालणार नाही, चालणार नाही. आपण हे स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळवले आहे. आपण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभागलेले आहोत. आपण जात आणि धर्माने विभागलेले आहोत, पण आपण यात अडकून पडता कामा नये. आम्ही २० जून रोजी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढू. यावेळी, जेव्हा आम्ही दिल्लीला जाऊ, तेव्हा राजीनामा दिल्याशिवाय परत येणार नाही. त्यांनी “दिल्ली चलो!” अशी घोषणाही दिली. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *