महाराष्ट्राचा मराठी माणूस PM व्हावा गद्दार सोडून; फडणवीसांना संघाचाही पाठिंबा; उद्धव ठाकरे यांचा दावा – Marathi News | Uddhav Thackeray says Maharashtras Marathi leader should become Prime Minister not traitors


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू ठेवला असून, आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. त्यांनी शिंदे गटात गेलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदार संघात जाऊन पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राचा मराठी माणूस PM व्हावा गद्दार सोडून असे वक्तव्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संघाचाही पाठिंबा आहे असा दाव त्यांनी केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संसदेच्या बिलाबाबत केंद्राकडून संपर्क झाला नव्हता. आम्ही विरोधी पक्ष आहोत. हा शब्द खोडला पाहिजे. आम्हीही जनतेचे प्रतिनिधी आहोत. तुमच्यासोबत असताना आम्हीही सत्ताधारी होतो. आम्हाला जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. कोणतंही विधेयक आणण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांना बोलवा. सूचना घ्या. आज तुम्ही सत्तेत आहात. उद्या आम्ही असू. तुम्ही विरोधात असाल. त्यामुळे काही आक्षेप आणि सूचना असतील तर त्या घेतल्या पाहिजे.

उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

पुढे ते म्हणाले, मी शहा सेनेबद्दल काही बोलू शकत नाही. एसंशि हा गट शहा सेना आहे. गद्दार सरदाराबद्दल मी बोलू इच्छित नाही. ते लायकीचे नाही. मला फडणवीस यांची काळजी वाटते. महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्यात गैर नाही. मागे गडकरीचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात होतं. त्यांना संघाचा पाठिंबा होता. त्यांना बदनाम करण्यात आलं. फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. ते रेसमध्ये येऊ नये म्हणून कारस्थान चाललंय की काय. शाह यांची सुपारी घेऊन हे चाललं आहे. चेष्टा मस्करी करत नाही. मला फडणवीस यांच्या करिअरची काळजी वाटते. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्यात गैर काय. नरसिंह राव हे महाराष्ट्रातून निवडून यायचे. पण पंतप्रधान झाल्यावर ते आंध्रातून ते निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपला माणूस पंतप्रधान होतोय म्हणून उमेदवार दिला नव्हता. महाराष्ट्रानेही अशी अस्मिता का बाळगू नये.

गद्दार सोडून महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती पंतप्रधान व्हावा. पंतप्रधान पदाची तयारी करत आहे, असं फडणवीस म्हणाले तर ते राहतील का पक्षात. आता जाहीर करणं म्हणजे आत्मघात करणं आहे. २०२९मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान होत असेल तर आम्ही सोबत राहू. पण गद्दारांसोबत राहणार नाही असे ते शेवटी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *