Shreyas Iyer on India suffer shock loss against Ireland : बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध 34 धावांनी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नव्या पर्वाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. चालू टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला आयर्लंडसारख्या संघाने नमवल्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर कमालीचा नाराज दिसला आणि त्याने सामन्यानंतर खेळाडूंना कडक शब्दांत सुनावले.
Ireland win the first T20I in Belfast by 34 runs.#TeamIndia will now aim to level the series on Sunday.
Scorecard ▶️ https://t.co/gdoXw2dAKR#IREvIND pic.twitter.com/kxnHM9ApeV
— BCCI (@BCCI) June 26, 2026
अभिषेक शर्माची झुंज अपयशी…
या सामन्यात आयर्लंडने भारतासमोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय फलंदाजांना हे लक्ष्य गाठता आले नाही. फक्त सलामीवीर अभिषेक शर्माने खिंड लढवत अवघ्या 19 चेंडूंत तुफानी अर्धशतक ठोकले. परंतु, त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ मिळाली नाही. इतर प्रमुख फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरल्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.
सामने सहज जिंकता येत नाहीत…, श्रेयस अय्यरचा खेळाडूंना थेट इशारा
पराभवानंतर बोलताना श्रेयस अय्यरने खेळाडूंच्या मानसिकतेवर बोट ठेवले. तो म्हणाला की, “तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टीला गृहीत धरू शकत नाही. तुम्ही फक्त मैदानात उतरलात आणि सामना जिंकलात, असे कधीच होत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानावर कठोर मेहनत घ्यावीच लागेल आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करावा लागेल.”
अय्यरने पुढे कडक शब्दांत वॉर्निंग दिली की, “जेव्हा तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली आणण्याची संधी मिळते, तेव्हा ती सोडायची नसते. सामन्यातील कोणत्याही परिस्थितीला किंवा क्षणाला हलक्यात घेणे खपवून घेतले जाणार नाही. आपल्याला नेहमी वर्तमानात राहून सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.”
गोलंदाजीतील चुका आणि दुबळे दुवे
भारतीय गोलंदाजीवर बोलताना अय्यर म्हणाला, “सुरुवातीला आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांना स्विंग मिळाला आणि विकेट्सही मिळाल्या. परंतु, मधल्या षटकांमध्ये आमची रणनीती चुकली. मैदानाची सीमारेषा लहान आहे हे माहीत असतानाही आम्ही फलंदाजांना समोरच्या दिशेने फटके मारण्याची संधी दिली. सुरुवातीची स्थिती पाहता आयर्लंडला 140 धावांच्या आत रोखणे शक्य होते, जे आपल्यासाठी सोपे लक्ष्य ठरले असते. पण काही हरकत नाही, हा एक चांगला अनुभव होता. आम्हाला येथील वातावरणात खेळायला मिळाले, खेळपट्टीचा योग्य अंदाज आला आणि हो, कर्णधार म्हणून ही एक चांगली सुरुवात आहे.”
असे असले तरी, दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हर्षित राणा आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचे अय्यरने कौतुक केले. हर्षितने दुखापतीनंतर अशा स्तरावर केलेली गोलंदाजी अप्रतिम होती, तर शिवम दुबेच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्याने सांगितले.
दीर्घ विश्रांतीनंतर संघ मैदानात उतरल्यामुळे खेळाडूंमध्ये काहीसा सुस्तपणा जाणवला, हे मान्य करत श्रेयस म्हणाला की, “आम्ही हा पराभव विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. या सामन्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. पुढील सामन्यात आमचा संघ पूर्ण ताकदीने आणि नव्या ऊर्जेने मैदानात उतरेल.”
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला