Last Updated:
रात्री उशिरा रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. सगळ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे, सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भिवंडी: राज्यात एकीकडे भेसळयुक्त अन्न पदार्थावर कारवाईचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे, मुंबईजवळील भिवंडीमध्ये शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आता विषबाधीत रुग्णांची संख्या ही 88 वर पोहोचली आहे. सगळ्या रुग्णांना स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 6 आणि इतर असे एकूण 37 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. पण दुसऱ्या रात्री उशिरा रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे. सगळ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे, सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी शहरातील खंडू पाडा परिसरात एका फेमस शोरमा नावाच्या दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा खरेदी करून काल रात्री घरी नेऊन खाल्ले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागले. दुपारपर्यंत त्रास वाढल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे जाणवू लागली होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अन औषध विभागाच्या वतीने दुकानावर छापा टाकण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले खाद्यपदार्थ यांची चौकशी करण्यात आली असून संबंधित दुकान मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दिलसाद अन्सारी असं दुकान मालकाचे नाव आहे. याप्रकरणी अन्न विषबाधेचं नेमकं कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शांतिनगर पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
Jun 19, 2026 11:27 PM IST
