भारतीय महिला संघाने 14 जून रोजी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलं. भारताने एकतर्फी फरकाने सामना जिंकत मोहिमेची सुरुवात विजयाने केली. भारतीय महिला संघाचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 9 सामन्यांमधील सातवा विजय ठरला. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर ढेर झाली. पाकिस्तानला या पराभवानंतर मोठा झटका लागला आहे. आयसीसीने पाकिस्तानवर कारवाईचा चाबूक फिरवला आहे. पाकिस्तानला टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यादरम्यान 1 चूक चांगलीच महागात पडली आहे. आयसीसीने पाकिस्तानवर नक्की कोणत्या कारणामुळे ही कारवाई केली आहे? हे जाणून घेऊयात.
भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. भारताने स्मृती मंधाना हीच्या 68 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 171 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानला सामना जिंकायचं सोडा संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 ओव्हरमध्ये 1O6 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे 2 गुण कमावले. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आयसीसीने पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पाकिस्तानला सामन्याच्या मानधनापैकी 5 टक्के दंड
पाकिस्तान क्रिकेट टीम निर्धारित वेळेत 20 पूर्ण करण्यात अपयशी ठरली. पाकिस्तानकडून अशाप्रकारे ओव्हर रेटचं उल्लंघन झालं. पाकिस्तान निर्धारित वेळेत 6 बॉल अर्थात 1 ओव्हर टाकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे पाकिस्तावर कारवाई करण्यात आली आहे. नियमाचं उल्लंघन झाल्याने पाकिस्तानला सामन्याच्या एकूण मानधनापैकी 5 टक्के रक्कम दंड द्यावा लागणार आहे. पाकिस्तानची कर्णधार सना मलिक हीने आपल्याकडून झालेली चूक मान्य केली. त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज लागली नाही.
पाकिस्तानचा दुसरा सामना कधी आणि केव्हा?
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीमचं पहिल्याच पराभवानंतर बाद फेरीत पोहचणं अवघड वाटत आहे. पाकिस्तान पहिल्याच पराभवानंतर ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी 12 संघांना ए आणि बी अशा 2 गटात 6-6 नुसार विभागण्यात आलं आहे. पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट हा -3.200 असा आहे. पाकिस्तानसमोर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. हा सामना बुधवारी 17 जून रोजी होणार आहे.