नागपूर : राज्यात सद्यस्थितीत कुठल्याही निवडणुका नसताना ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षात वेगळा गट स्थापन होत असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असून एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’शी चर्चा होत आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने (MLA) यांनी मोठा गौप्सस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची अंतिम बोलणी झाल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे हा दावा फेटाळून लावला आहे.
राज्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून होत असलेल्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम बोलणी झाल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. तसेच, ऑपरेशन टायरगर फायनल झाले आहे, फक्त या आमदार व खासदारांच्या पक्ष प्रवेशाची तारीख ठरायची आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर शिवसेना उबाठा पक्षातील आमदार, खासदार नाराज असल्याने ते शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले.
उदय सामंतांनी ऑपरेशन टायगर फेटाळले
उबाठाच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नाही, अशी कोणतीही मीटिंग झाली नाही. आम्हाला ऑपेरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच, संजय राऊत यांच्या पेशन्सला दाद देत त्यांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे, एकप्रकारे उदय सामंत यांनी ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचेच सूचवलं आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपशी संबंध नाही
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत, ह्यासंदर्भात रावसाहेब दानवे म्हणाले की, ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ह्या अगोदर तामिळनाडूमध्ये एक गट सुद्धा स्थापन झाला. एका पक्षात विलिनीकरण सुद्धा झाले. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेतील तो गट वेगळा होतो की नाही होतो, हे तोच पक्ष ठरवू शकतो. भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांचा काहीही संबध नाही. अजून तरी गट स्थापन नाही, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी ऑपरेशन टायगरवर दिली.
हेही वाचा
‘ऑपरेशन टायगर’बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी